प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नवी मुंबईला काही कमी पडू देणार नाही ही देवा भाऊची गॅरंटी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई : नवी मुंबईच्या सर्व मागण्या पूर्ण करून नवी मुंबईला काहीही कमी पडू देणार नाही ही देवा भाऊची गॅरंटी आहे, असे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची भव्य सभा ऐरोली येथे पार पडली. याप्रसंगी नामदार गणेश नाईक केंद्रीय मंत्री रामदास आठवले भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार मंदाताई म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी आमदार सुभाष भोईर आरपीआयचे सिद्राम ओव्हाळ आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
भाजपाच्या माध्यमातून नवी मुंबईचा विकास असाच सुरू राहावा अशी येथील जनतेची इच्छा असल्याचे नामदार नाईक म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्यामुळे नवी मुंबईचे अनेक प्रश्न सुटल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वीस वर्षे मालमत्ता आणि पाणीपट्टी कर वाढवणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. नवी मुंबईची पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी तरतूद करण्यासाठी पोशिर धरणाचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती दिली. नवी मुंबई परिवहन सेवा, पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा उत्तम असल्याचे सांगून गाव गावठाण शहर आणि झोपडपट्ट्यांचा नियोजनबद्ध विकास करणार असल्याचे नमूद केले.
ना. गणेश नाईक नवी मुंबईच्या विकासाला गती देणारे आणि समता प्रस्थापित करणारे नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री आठवले यांनी काढले.
राज्य सरकारमार्फत नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात असून देशातले विकसित शहर म्हणून नवी मुंबई उदयास येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. नवी मुंबई विमानतळामुळे एमएमआर रीजनमध्ये नवी मुंबई विकासाचे ग्रोथ इंजिन बनत आहे. येथील भूमिपुत्रांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यात येतील. झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करून झोपडपट्टी बांधवांना मालकी हक्क देण्यात येईल. सिडकोची बांधकामे फ्रीहोल्ड करू. नवी मुंबईला मुंबईशी मेट्रो आणि वॉटर ट्रान्सपोर्ट ने जोडण्यात येईल. नवी मुंबई विमानतळाचे नामकरण दि बा पाटील यांच्या नावानेच करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व लोकल गाड्या वातानुकूलित करणारा असून सेकंड क्लासच्या भाड्यामध्ये मात्र कोणतीही वाढ करणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. नवी मुंबईच्या पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी तरतूद करण्यासाठी पोशिर धरणाचे काम सुरू झाले असून येत्या चार वर्षात ते पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली. नवी मुंबईतील नागरी सुविधांच्या जागा महापालिकेला देण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. घनसोली सिम्पलेक्स वसाहतीचा पुनर्विकास करू. एपीएमसी मार्केट दुसरीकडे कुठेही हलवणार नाही तर याच ठिकाणी सुविधायुक्त एपीएमसी निर्माण करण्यात येईल. गणेश नाईक यांच्या नेतृत्वात नवी मुंबईचा विकास झाला असून तब्बल 26 पेक्षा अधिक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी या शहराला गौरवल्याचे त्यांनी नमूद केले. नवी मुंबईचे काम कुठेही आडणार नाही असे सांगून नवी मुंबईच्या विकासात कोणताही अडथळा येऊ देणार नाही असे वचन त्यांनी दिले. कमळाचे बटन दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.