प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नवी मुंबईतील विजयी नगरसेवकांना रविंद्र चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नगरसेवकांचे अभिनंदन करण्यासाठी १७ जानेवारी रोजी नवी मुंबईत दाखल झाले होते. नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे तब्बल 65 उमेदवार विजयी झाले असून, या विजयी नगरसेवकांचा सत्कार करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी कोपरखैरणे येथील ‘क्रिस्टल हाऊस’ या कार्यालयाला भेट दिली. याप्रसंगी ना. गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, सुधाकर सोनवणे, विजयी उमेदवार तसेच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी रवींद्र चव्हाण यांनी खास लुंगी परिधान केली होती. त्यांच्या या लुंगीच्या पेहरावामुळे उपस्थितांमध्ये एक वेगळीच चर्चा रंगली होती.
पश्चिम भारतात वेगळी ओळख निर्माण केलेले दृश्य उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, नवी मुंबईची ओळख द्विगुणीत करण्याची जबाबदारी आता नगरसेवकांवर आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर ‘वॉर्ड व्हॉइस’ सारख्या स्पर्धा राबवाव्यात, ज्यातून इतर शहरांनाही नवी मुंबईचा आदर्श घ्यावा लागेल. शहराची वेगळी ओळख निर्माण होईल असे अभिनव उपक्रम राबवले, तर त्याचा थेट फायदा नवी मुंबईकरांनाच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शासकीय विविध संस्थांमध्ये सध्या साडेसहाशेहून अधिक पदे रिक्त असून, सक्षम आणि कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशांना न्याय देण्यात येईल, असेही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.