‘वसई-विरार'मध्ये मीटरवर आधारित टॅक्सी, रिक्षा सेवा
मुंबई : वसई-विरार महापालिका क्षेत्रात १५ नोव्हेंबर पर्यंत टॅक्सी, रिक्षा चालकांना मीटरवर आधारित सेवा सुरु करण्यासाठी मुदत देण्यात येत आहे. या क्षेत्रात मीटरवर आधारित टॅक्सी, रिक्षा सेवा १५ नोव्हेंबर पासून सुरु करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
मंत्रालय येथे वसई-विरार महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत आयोजित बैठकीमध्ये ना. प्रताप सरनाईक बोलत होते. सदर बैठकीस आमदार स्नेहा दुबे, ‘एसटी महामंडळ'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वसई-विरार महापालिका आयुक्त मनोज सूर्यवंशी, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर, आदि उपस्थित होते.
वसई-विरार महापालिका क्षेत्रात शेअर टॅक्सी सेवेला परवानगी आहे. टॅक्सी, रिक्षा चालकांनी प्रवाशांची लुबाडणूक करु नये, प्रवाशांच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. वसई-विरार महापालिका क्षेत्रातून ‘एसटी महामंडळ'ने ठाणे, कल्याण मार्गावर लांब पल्ल्याची बस सेवा सुरु करावी. प्रवाशी संख्या लक्षात घेता शहर बस वाहतूक पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी. महापालिका क्षेत्रात असलेल्या ‘महामंडळ'च्या जागांचा पार्किंग जागांसाठी उपयोग करावा. यासाठी जागा लागल्यास महापालिकेने जागेचे नियोजन करावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिले.
वसई-विरार महापालिका क्षेत्रात असलेल्या विरार, वसई, नालासोपारा येथे बस डेपो सुरु करावेत. नागरिकांना परिवहन सेवा सुलभरित्या मिळावी, याबाबत महापालिकेने कार्यपध्दती ठरवून अंमलबजावणी करावी, असे निर्देशही ना. प्रताप सरनाईक यांनी दिले.