भिवंडी मध्ये १४४४ इमारती धोकादायक
इमारती निर्मनुष्य करण्यात प्रशासनाला अडचणी
भिवंडी ः धोकादायक इमारती प्रत्येक शहरातील जटील समस्या झाली आहे. अशा इमारती निर्मनुष्य करण्यात स्थानिक प्रशासनाला अनेक वेळा अपयश येत असल्याने या इमारतींच्या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. या परिस्थितीत सदर धोकादायक आणि अती धोकादायक इमारतींमध्ये हजारो रहिवासी आपला जीव मुठीत धरुन राहताना दिसत आहेत.
असेच वास्तव भिवंडी-निजामपूर शहर महापालिका हद्दीत देखील आहे. भिवंडी महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार भिवंडी शहरात १४४४ इमारती या धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. भिवंडी मधील धोकादायक इमारत दुर्घटनांच्या घटना पाहता आतापर्यंत यात ९० हुन अधिक बळी गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक आणि अती धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याचे निर्देश असताना महापालिका प्रशासनाकडून याबाबत गांभीर्य बाळगले जात नाही. त्याचा फायदा घेत थातूर-मातुर दुरुस्ती आणि रंगरंगोटी करुन धोकादायक इमारती तग धरुन उभ्या आहेत.
मागील वर्षी शहरात ५ प्रभाग समिती अंतर्गत १३११ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये १३३ इमारतींची भर पडली आहे. ज्यामध्ये २८७ इमारती अतिधोकादायक असून यामध्ये रहिवाशी इमारतींसह कौलारु घरे, यंत्रमाग कारखाना यांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात अती धोकादायक सी-१ श्रेणीतील इमारतींची संख्या २८९ आहे. तर इमारत निर्मनुष्य करुन दुरुस्ती करण्याच्या सी-२ ए श्रेणीत ७३८, इमारतीमध्ये राहून दुरुस्ती करण्याच्या सी-२ ब श्रेणीत ३७२ तर किरकोळ डागडुजी करण्या लायक सी-३ श्रेणीत ४५ इमारतींचा समावेश आहे, अशी माहिती महापालिकेचे शहर विकास अधिकारी अरविंद घुगरे यांनी दिली आहे.
मागील वर्षी अशा धोकादायक इमारतींपैकी ४९ इमारती निष्कासित करण्यात आल्या. पण, गत ३ महिन्यात अशा इमारती निष्कासित करण्याची कारवाई थंडावलेली आहे. यामधील अतिधोकादायक क्षेत्रातील इमारतींची संख्या २८९ तर इमारत निर्मनुष्य करुन दुरुस्ती करणाऱ्या इमारतींची संख्या ७३८ अशी लक्षणीय आहे. परंतु, दुर्दैव की यापैकी अनेक इमारतींमध्ये आजही शेकडो कुटुंबीय वास्तव्य करीत आहेत. अशा धोकादायक इमारतींवर महापालिका प्रशासनाने कठोर कारवाई करुन भविष्यात होणारी दुर्घटना आणि त्यामुळे होणारी जीवितहानी टाळावी, अशी अपेक्षा आहे. पण, अशा इमारती निर्मनुष्य करण्यात सर्वात मोठा अडथळा स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय नेतेमंडळी यांचा येत आहे. तर अनेक इमारती अनधिकृत पध्दतीने उभ्या राहिल्या असतानाच जमीन मालक आणि पगडी पध्दतीने पलॅटस् घेतलेले कुटुंबीय यांच्या वादात असंख्य इमारती निर्मनुष्य करण्यात अडचणी येत आहेत, असे वास्तव समोर आले आहे.