सुट्टीमध्ये बाहेरगावी जाताय, सावधान!

नवी मुंबई : एप्रिल-मे महिना म्हटला तर चोरट्यांसाठी सुगीचा काळ. या कालावधीत बहुतेक कुटुंब आपल्या मुळ गावी अथवा बाहेरगावी मौजमजा करण्यासाठी जात असतात. नेमकी हीच संधी साधून चोरटे अशी घरे हेरुन ते पूर्णपणे साफ करतात. या सुट्टीच्या हंगामात चोरट्यांचा सुळसुळाट वाढून चोरी-घरफोडी सारख्या घटना घडत असल्याने नागरिकांनी सुट्टीच्या हंगामात बाहेरगावी जाताना सावधगिरी बाळगण्याबरोबरच आपल्या सुट्टीचे नियोजन तसेच बाहेरगावातील आपले फोटो सोशल मिडीयावर शेअर करु नयेत, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.    

उन्हाळ्याच्या सुट्टीत बहुतेक नागरिक सहकुटुंब बाहेरगावी जातात. या सुट्टीच्या कालावधीत बंद घर म्हणजे चोरट्यांसाठी रान मोकळे असते. त्यामुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यात घरफोडी-चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. घरफोड्या करणाऱया अनेक टोळ्या या सुट्टीच्या काळात परराज्यातून मुंबई, नवी मुंबई सारख्या शहरामध्ये तळ ठोवूÀ असतात, ते यापूर्वीच्या कारवायांवरुन दिसून आले आहे. अनेकदा घरफोडी करणाऱ्यांमध्ये परराज्यातील टोळीचा समावेश असल्याचे तसेच या टोळ्या बंद घरांचा माग काढत, घरफोड्या करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.  

घरामध्ये चोरी होऊ नये यासाठी नागरिकांनी बाहेरगावी जाण्यापूर्वी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत पोलिसांकडून प्रत्येक वर्षी नागरीकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या जातात. मात्र, नागरिक पोलिसांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करुन बिनधास्त बाहेरगावी निघून जातात. परिणामी, चोरटे त्यांचे संपूर्ण घर साफ करुन पसार होतात. मात्र, चोरी झाल्यानंतर पोलिसांना लक्ष्य केले जाते. वास्तविक पाहता आपल्या घरी चोरी होऊ नये यासाठी नागरिकांनी देखील आधी स्वतः काळजी घेणे, दक्ष राहणे आणि बाहेर जातांना त्याची माहिती पोलिसांना देणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

बहुतेक नागरिक बाहेरगावी फिरण्यासाठी गेल्यानंतर फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या सोशल मिडीयावर आपले फोटो टाकत असतात. सध्या चोरटे देखील सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याने बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांची माहिती ते सोशल मिडीयावरुन मिळवितात. त्यानंतर बंद असलेले त्यांचे घर साफ करतात. चोरट्यांनी सोशल मिडीयावरुन अशा प्रकारे माहिती मिळवून अनेक घरफोड्या केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे बाहेरगावी गेलेल्या नागरिकांनी आपले फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर टावूÀ नये, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे. याबाबत पोलिसांकडून जनजागृती देखील करण्यात येत आहे.    

बाहेरगावी जाणाऱ्या कुटुंबियांनी कोणती काळजी घ्यावी...

गावी अथवा बाहेरगावी जाताना घर नीट बंद करा. आपण बाहेर जात असल्याची कल्पना शेजाऱ्यांना द्या. जास्त काळ बाहेरगावी जायचे असल्यास आपल्या घरात जास्त पैसे, सोन्याचे दागिने ठेवू नये. गावाला जाण्याबाबत तसेच परत येण्याबाबतची माहिती परिसरातील पोलीस स्टेशनला द्यावी. बाहेर जाताना कपाटाच्या चाव्या सोबत घेऊन जाव्यात. तसेच मौल्यवान वस्तू घरात न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत. घरात नोकर ठेवताना नोकराचे संपूर्ण नांव, गांव, वय, राहण्याचा पत्ता-संपर्क क्रमांक घेऊन ठेवावेत. नोकराचे मूळ राहण्याचे ठिकाण तसेच त्याच्या कुटुंबयिांची माहिती घ्यावी, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.    

त्याचप्रमाणे नोकरास ओळखणाऱ्या परिसरातील दोघांची नावे, पत्ता आणिदूरध्वनी क्रमांक, नोकराचा पासपोर्ट फोटो आणि शक्य झाल्यास त्याच्या बोटाचे ठसे घेऊन ठेवावेत. नोकरासमोर आपल्या संपतीचे प्रदर्शन करु नये. नोकर घरात नसताना मौल्यवान वस्तू तसेच पैसे कपाटात ठेवावेत. कपाटाच्या चाव्या नोकराच्या हाती लागणार नाही, याची काळजी घ्यावी. रात्री झोपताना घराची दारे, खिडक्या, कंपाऊंडचे गेट व्यवस्थित बंद असल्याची खात्री करावी. शेजाऱ्यांना आपले फोन नंबर, कार्यालयाचा पत्ता, जवळच्या नातेवाईकांचा पत्ता, आदि आवश्यक असणारी माहिती देऊन ठेवण्याबाबत देखील सूचना पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : राजू पाटील चा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला