शेतकरी समाज मंदिर मंगल कार्यालय धोकादायक?

वाशी : कोपरखैरणे सेक्टर-४ येथील ‘खारी कळवा बेलापूर विभाग शेतकरी  संघटना'चे शेतकरी समाज मंदिर धोकादायक झाले असून, वेळी अवेळी समाज मंदिर इमारतीच्या छताच्या प्लास्टरचे तुकडे खाली पडत आहेत. या अवस्थेतही सदर शेतकरी समाज मंदिर मंगल कार्यक्रमासाठी वापरले जात आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी दुर्घटना झाल्यास त्यास जबाबदार कोण?, असा प्रश्न उपस्थित करत सदर शेतकरी समाज मंदिर इमारतीची तात्काळ डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

 शहरी भागात आजकाल मंगल कार्य असल्यावर जागेअभावी  सर्व नागरिक मंगल कार्यालयाची वाट धरतात. तर नवी मुंबई शहरातील आगरी-कोळी समाजातील नागरिक त्यांच्या घरात साखरपुडा, लग्न कार्य  असले की पहिली पसंती कोपरखैरणे सेक्टर-४ मधील ‘खारी कळवा बेलापूर विभाग शेतकरी  संघटना'च्या शेतकरी समाज मंदिराला देतात. मात्र, अलिकडील काळात शेतकरी समाज मंदिर व्यवस्थापनाकडून समाज मंदिराची डागडुजी तसेच स्वच्छतेकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसते. शेतकरी समाज मंदिर हॉलची आजची परिस्थिती अतिशय धोकादायक झाली आहे. हॉल मधील छताचे प्लास्टर खाली पडत असून, आतील सळया स्पष्ट दिसत आहेत.त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण?, असा सवाल आगरी-कोळी समाज बांधवांकडून उपस्थित केला जात आहे.

दुसरीकडे शेतकरी समाज मंदिर हॉल मधील शौचालयामध्ये  कोणतीही साफसफाई होत नसल्याने घाणीचा दुर्गंध संपूर्ण परिसरात पसरलेला असून, स्वच्छतेच्या बाबतीत शेतकरी समाज मंदिर हॉल कार्यकारिणी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आगरी-कोळी समाज बांधवांकडून होत आहे.
---------------------------------------
‘खारी कळवा बेलापूर विभाग शेतकरी समाज संघटना'च्या कोपरखैरणे सेक्टर-४ येथील शेतकरी समाज मंदिर हॉल मधील स्लॅब अतिशय धोकादायक झालेला असून, स्लॅबचे तुकडे खाली कोसळत आहेत. या हॉल मध्ये लग्नकार्याच्या वेळी कोणताही अपघात झाल्यास त्यास ‘खारी कळवा बेलापूर विभाग शेतकरी समाज संघटना'ची कार्यकारिणी जबाबदार आहे. त्यामुळे ‘संघटना'ने याचा गांभीर्याने विचार करुन त्वरित ‘शेतकरी समाज मंदिर हॉल'ची दुरुस्ती करण्याची गरज आहे. - प्रदीप नामदेव म्हात्रे, अध्यक्ष - दिव्यादिप फाउÀंडेशन, नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

५ जून पर्यंत मालमत्ता कर भरल्यास १० टक्के सूट