‘दिबां'च्या जन्मदिनी स्फूर्ती चळवळ स्पर्धा गुणगौरव

उरण : ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पुढाकाराने दि. बा. पाटील यांचे त्याग आणि विचारांचे आंदोलन, साहित्य आणि कलेच्या माध्यमातून सतत तेवत ठेवण्यासाठी आयोजित केलेल्या ‘दि. बा. पाटील स्फूर्तीस्थान' या चळवळ स्पर्धेच्या द्वितीय चरणातील विजेत्या स्पर्धकांचा गुणगौरव समारंभ आणि या चळवळ स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध शैक्षणिक संस्थांमधील समर्पित शिक्षकांचा सन्मान माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साही वातावरणात ‘दिबां'चे जन्मगाव जासई येथे पार पडला.

सदर गुणगौरव सोहळा १३ जानेवारी रोजी दि. बा पाटील यांच्या जयंती दिनी क्रांतीक्षेत्र जासई येथील मंगल कार्यालय हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी सदर ‘चळवळ स्पर्धा'मधील दुसऱ्या चरणात विविध कला आणि साहित्य सादर केलेल्या गुणवंत विजेत्यांना तसेच दि. बा. पाटील यांच्या कार्याची आणि विचारांची महती विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या शिक्षकांना आणि स्पर्धेच्या संयोजकांना माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. या गौरव सोहळ्याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, ‘रायगड जिल्हा काँग्रेस'चे अध्यक्ष महेंद्र घरत, कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील, दि. बा. यांचे सुपुत्र अतुल पाटील, शेकाप नेत्या सीमाताई घरत, राजेश गायकर, ‘जासई'चे सरपंच संतोष घरत, उपसरपंच माई पाटील, कार्यक्रम समन्वयक सुरेश पाटील, विनोद म्हात्रे, आदि उपस्थित होते.सदर सोहळ्याचे नियोजन जासई ग्रामस्थ आणि वाशीगांव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.  

देशातील तसेच नवी मुंबईतील निवासी आणि मूळ निवासी नागरिक यांचे मूलभूत हक्क आरक्षित आणि सुरक्षित रहावेत, असा विचार दि. बा. पाटील यांचा होता. देशातील सर्वधर्मियांसाठी त्यांचा त्याग, संघर्ष प्रेरणादायी होता. दि. बा. पाटील स्फुर्ती स्थान चळवळ स्पर्धा एक आंदोलन आहे. सदर आंदोलन कला आणि साहित्याच्या रुपाने भविष्यात प्रज्वलित रहावे हाच आमचा हेतू आहे. दि. बा. पाटील यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नजरेतून अभिप्रेत असलेल्या रयतेच्या कल्याणकारी कार्यपध्दतीचा पगडा होता. ‘दिबां'नी राजश्री शाहू, महात्मा फुले आणि डॉ आंबेडकर या महापुरुषांच्या विचार आणि परंपरेचे जतन केले.

‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'च्या माध्यमातून विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांना संयोजक म्हणून सोबत घेत सुनियोजित नियोजन करुन लोकनेते ‘दिबां'च्या संघर्षमय लढ्यांची यशोगाथा जगभरात जावी यासाठी ‘लोकनेते दि. बा. पाटील चळवळ स्पर्धा' असा अनोखा उपक्रम दशरथ भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी केला आहे. ‘दिबां'च्या संघर्ष जीवनातून बाधित, पिडीत यांच्यासाठी अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा केवळ चळवळ जिवंत ठेऊ शकते. ‘दिबां'च्या संघर्षाची चळवळ यापुढील काळात दशरथ भगत अविरत सुरु ठेवतील, अशी अपेक्षा आहे. ‘दिबां'नी सलग ३३ वर्षे संघर्ष करुन विविध लढाई यशस्वी केल्या. आम्ही देखील भूमीपुत्रांच्या न्याय आणि हक्कासाठी काही काळ भूमिगत होतो. आज आपण प्रगती करत आहोत. मासेमारी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या घटकांचे काही प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यांना न्याय निश्चित मिळेल.
-लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार.

देश आणि राज्यातील मूळ निवासी यांच्या हक्क आणि अधिकार साठी संघर्ष करुन त्यांनी न्याय दिला. -दशरथ भगत, आयोजक-दि. बा. पाटील चळवळ स्पर्धा तथा माजी विरोधी पक्षनेते, नवी मुंबई महापालिका.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी आम्ही यापुढे संघर्ष करु. दि. बा. पाटील यांनी उभारलेला लढा आणि चळवळ सतत ठेवत ठेवा हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. -कॉम्रेड भूषण पाटील. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहाला नवी झळाळी