‘स्वच्छ सर्वेक्षण'साठी सर्व विभागांनी एकत्रित समन्वय साधून काम करावे -आयुक्त राव

ठाणे : स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत साध्य करायची सगळी उद्दिष्ट महापालिका म्हणून आपले प्राथमिक कर्तव्य आहेत. त्यामुळे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महापालिका अधिकारी-कर्मचारी यांनी एक टीम बनून योग्य रणनिती आखून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले.

‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४'ची तयारी सुरु झाली आहे. याबाबतची माहिती देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी अधिकाऱ्यांचे क्षमता वृध्दी सत्र महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या सत्रामध्ये ठाणे महापालिकेने ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'मध्ये केलेली कामगिरी, त्यातील त्रुटी, सुधारणा याची माहिती देण्यात आली. तसेच  ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४'साठी अपेक्षित असलेली उद्दिष्ट, त्यासाठी तयारी, जनजागृती आणि लोक सहभाग याबद्दल सविस्तर सादरीकरण ‘घनकचरा व्यवस्थापन विभाग'तर्फे करण्यात आले.कार्यक्रमात प्रास्ताविक उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार यांनी केले.

‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान'ला केंद्र सरकारने शास्त्रोक्त स्वरुप दिले आहे. इंदोर, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, आदि ठिकाणी त्यांचे सकारात्मक परिमाण दिसले आहेत. तेथील चांगल्या गोष्टींचा अभ्यास करुन ठाणे महापालिका क्षेत्रात त्यातील कोणत्या गोष्टी घेता येतील, याचा अभ्यास करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी सत्रामध्ये दिल्या.

‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान'मध्ये चांगले गुण मिळवणे एक प्रमुख साध्य आहेच; परंतु या सर्व गोष्टी नागरिकांचे जीवनमान उंचावण्याशी निगडीत आहेत. महापालिकेची जी प्राथमिक जबाबदारी आहे, तीच या ‘अभियान'ची उद्दिष्ट्ये आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जावे. सहायक आयुक्त यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व टीमने काम करावे. मुख्यालयातून त्यासाठी आवश्यक धोरण ठरवले जाईल. त्याशिवाय स्थानिक पातळीवर नावीन्यपूर्ण उपक्रम करावेत, अशी सूचना आयुक्त राव यांनी केली. त्यासाठीच प्रभाग समिती स्तरावर स्वच्छ वॉर्ड स्पर्धाही आयोजित केली जात असल्याची घोषणा यावेळी आयुक्तांनी केली.

याप्रसंगी अतिरिवत आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिवत आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मनिष जोशी, उमेश बिरारी, दिनेश तायडे, वर्षा दिक्षीत, सर्व सहायक आयुक्त, सर्व विभाग प्रमुख यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शेतकरी समाज मंदिर मंगल कार्यालय धोकादायक?