म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'ची कंपन्यांना वलोजर नोटीस
डोंबिवली : ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ'ने डोंबिवली औद्योगिक विभागातील कंपन्यांना क्लोजर नोटीस दिल्यामुळे येथील कंपनी मालक आक्रमक झाले आहेत. शासनाच्या या एकतर्फी निर्णयाविरोधात कंपनी मालक एकत्र झाले. त्यामुळे कंपनी मालकांना योग्य न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी ३१ मे रोजी एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी कंपनी मालकांनी एमआयडीसी अधिकारी राजेश मुळे यांची भेट घेवून त्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले.
२३ मे रोजी डोंबिवली मधील अमुदान रासायनिक कंपनीत रिॲक्टरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला तर ९ जण अजुनही बेपत्ता आहेत. परिणामी, शासनाने धोकादायक रासायनिक कंपन्या बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. याचाच भाग म्हणून ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या माध्यमातून येथील सर्वच कंपन्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षण अंतर्गत कंपन्यांना स्थलांतरीत करण्याच्या नोटीसाही देण्यात येत आहे. तसेच येथील कंपन्यांचा वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा बंद करा, असे आदेश ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'ने ‘एमआयडीसी'च्या अधिकाऱ्यांना दिला असल्याची माहिती आहे.
या निर्णयांविरोधात कंपनी मालक एकवटले असून त्याअनुषंगाने त्यांनी ‘एमआयडीसी'च्या अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले. दरम्यान, ‘एमआयडीसी'चे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्याने कनिष्ठ अधिकारी राजेश मुळे यांना कंपनी मालकांनी निवेदन देऊन केलेल्या मागण्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्याची विनंती केली.
जर आमचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडले तर आम्ही जायचे कुठे? आमचे आणि आमच्या कामगारांचे भवितव्य काय? जो अपघात झाला, त्याबद्दल आम्हालाही दुःख होत आहे. सदर घटनेची कायदेशीर कारवाई होत आहे. पण, जे कंपनी मालक निरपराध आहेत, त्यांना वेठीस का धरण्यात येत आहे? सर्वांनी नियमांचे पालन करुन उद्योग चालवावेत, असे ‘संघटनी'चे मत आहे. पण, क्लोजर नोटीस देऊन प्रदुषण नियंत्रण मंडळ अन्याय करत आहे. येथील कामगारांचे भवितव्य काय? कंपनी मालकांचे भवितव्य काय? विचारणा कंपनी मालक करीत आहेत. - डॉ. देवेन सोनी, कार्याध्यक्ष - कामा संघटना.