४५ वर्ष मतदान केले अन्‌ यंदा मतदान यादीतून नाव गायब

डोंबिवली : मतदानाच्या पाचव्या टप्पात डोंबिवली मध्ये मतदान यादीत नाव नसल्याने काही मतदारांनी ‘निवडणूक आयोग'च्या नावाने बोटे मोडली. दरम्यान, डोंबिवली मध्ये एका आजीने गेली ४५ वर्ष न चुकता मतदान केले. आता यावर्षी मतदान यादीत नाव नसल्याने मतदानाला मुकल्याने आजींनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार केली.

डोंबिवली मध्ये सकाळपासून मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसल्या. अनेकांची नावे मतदान यादीत नसल्याने आता मतदान करता येणार नसल्याने नाराजी व्यक्त केली. डोंबिवली पश्चिम मधील जयश्री जोशी या आजी गेली ४५ वर्ष मतदान करत होत्या. मात्र, यंदा लोकसभा निवडणुकीकरिता मतदान यादीत नावे नसल्याने नाराज झाल्या होत्या. याबाबत जोशी यांना विचारले असता त्या म्हणाल्या, माझ्या आयुष्यात प्रथमच असे झाले की, माझे नाव मतदान यादीत नाही. मी यावर्षी मतदान करु शकत नाही, त्याचे खूप वाईट वाटत आहे. माझी पहिलीच वेळ आहे, मी मतदान करु शकत नाही.

त्यामुळे या आजींनी आपली कैफियत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना सांगितली. तर माजी नगसेवक शैलेश धात्रक आणि माजी नगरसेविका मनिषा धात्रक यांनी या आजींचे म्हणणे यासंदर्भात निवडणूक कार्यालयाला माहिती देऊ, असे सांगितले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

झाले इलेक्शन...जपा रिलेशन!