वशेणी दादर समुद्रकिनारा अभ्यासदौरा संपन्न
उरण : अरबी समुद्राच्या खाडीचे सानिध्य लाभलेला उरण तालुक्यातील जवळपास ५ हजार लोकवस्तीचेे वशेणी गांव आहे. अरबी समुद्राचे करंजा बंदर मार्गे पाताळगंगा नदीपर्यत पाणी घुसते. याच पाताळगंगा खाडीत वशेणी दादर असा समुद्राचा खाडीकिनारा येतो. बदलते हवामान आणि लोकजीवन शैलीचा या खाडीकिनाऱ्यावर झालेला परिणाम अभ्यासण्यासाठी नुकताच ‘वशेणी इतिहास संपादकीय मंडळ'चा समुद्रकिनारा अभ्यास दौरा संपन्न झाला.
या अभ्यास दौऱ्याची सुरुवात समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जलपुजेने करण्यात आली. यावेळी समुद्राला श्रीफळ अर्पण करण्यात आला. तद्नंतर खाडीकिनारा, कांदळवने, खाजनाची जागा, समुद्री जीव यांचे निरीक्षण आणि तौलनिक अभ्यास करण्यात आला. या तौलनिक अभ्यासातून गेल्या २०-२५ वर्षापूर्वीचा समुद्रकिनारा आणि आताचा समुद्रकिनारा यामध्ये खूपच बदल झालेला दिसून आला. बदलत्या हवामानानुसार या किनाऱ्यावरील भालखुबे, शंकखुबे, आंग्रे, कांदिरवाल, तायतुपय यासारखे समुद्रीय जीव दुर्मिळ झाल्याचे दिसून आले. तर खाजनाच्या जागेत चिखलावर मौज-मजा करणारा निवटी मासा, पालका यांचे प्रमाण देखील खूपच कमी झाले आहे.
बदलत्या लोकजीवन शैलीमुळे कांदळवनाची योग्य देखभाल न झाल्याने खाडीकिनाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धूप होताना दिसत आहे. परिणामी, बांध फुटून समुद्राचे पाणी शेती क्षेत्रात घुसण्याची संभावना दिसून येते. वशेणी दादर पुल आणि खाडी परिसरात येणारे पर्यटक आणि मद्यप्रेमी यांच्यामुळे काचेच्या बाटल्या, प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक कागद यांचे साम्राज्य किनाऱ्यावर दिसून आले. याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.
समुद्राच्या खाड्या पाण्यावर जगणारी खाण्यालायक उपलब्ध असणारी भरपूर प्रमाणात आयोडीन देणारी वनस्पती म्हणजे डावला. पूर्वी डावला वनस्पती भाजीत, डाळीत, मच्छीत किंवा पातोळा बनवून खाल्ली जात होती. मात्र, अधुनिक जीवन शैलीत या भाजीकडे दुर्लक्ष झाले आहे. तरी तरुणांनी अधून-मधून आपला बुध्यांक आणि आयोडीन मात्रा वाढवण्यासाठी डावला भाजी आहारात वापरावी, असे आवाहन यावेळी ‘वशेणी इतिहास संपादकीय मंडळ'चे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले.
सदर अभ्यास दौऱ्यात पुरुषोत्तम पाटील, किशोर म्हात्रे, बी. जे. म्हात्रे, हरिश्चंद्र ठाकूर, सतिश पाटील, कैलास पाटील, अनंत पाटील, सुनिल तांडेल, हरेश्वर पाटील, आदि ‘मंडळ'चे सदस्य सहभागी होते.