‘वाचन प्रेरणा दिन' निमित्त ठाणे महापालिका तर्फे ‘चला वाचूया' उपक्रम

महापालिका शाळांमध्ये प्रत्येक वर्गात पुस्तकांचे स्वतंत्र कपाट

ठाणे : भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी राज्यभरात ‘वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरी केली जाते. या दिनानिमित्त युवा पिढीत वाचन संस्कृती रुजावी, वाढावी यासाठी उपक्रमाचे आयोजन केले जाते. ठाणे महापालिकेतर्फे ‘वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यासाठी ठाणे महापालिका शाळांमध्ये ‘चला वाचूया' उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

‘चला वाचूया' या उपक्रमाचा आरंभ किसननगर येथील महापालिका शाळा क्रमांक-२३ मध्ये १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने वर्षभरात सर्व महापालिका शाळांमध्ये सदर उपक्रम राबविला जाणार आहे. ‘लेटस्‌ रीड फाऊंडेशन'च्या सहकार्याने या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

या उपक्रमात महापालिकेच्या सर्व शाळांमधील पाचवी ते दहावी या इयत्तांमधील प्रत्येक वर्गात पुस्तक कोपरा निर्माण केला जाणार आहे. प्रत्येक वर्गात ३० पुस्तके असतील. पुस्तकांची निवड विद्यार्थ्यांच्या वयानुरुप आणि अपेक्षित विषयानुरुप केली जाईल. प्रत्येक वर्गाची पट संख्या लक्षात घेवून, त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण झाली तर वर्षभरात प्रत्येक विद्यार्थ्याची सर्व पुस्तके वाचून होतील. नवीन वर्षात, नवीन इयत्तेत नवीन पुस्तकांचा संच उपलब्ध होईल, अशी ‘चला वाचूया' उपक्रमामागची संकल्पना असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

शाळांमध्ये ग्रंथालये आहेत. मात्र, दुर्दैवाने सर्व विद्यार्थी या ग्रंथालयात नियमित जाता नाहीत. किंवा ती सुविधा सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे वर्गातच पुस्तक कपाट उपलब्ध झाल्याने कोणत्याही परवानगीची वाट न बघता विद्यार्थ्यांना पुस्तके सहज हाताळता येतील. कायम उपलब्ध (ल्हग्नीेीत् ीम्मेे) राहतील. ते साध्य करणे या उपक्रमाच्या माध्यमातून शक्य होणार आहे, असेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.

पुस्तकांचे पासबुक...
त्याचप्रमाणे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वाचनाच्या नोंदी ठेवण्यासाठी एक पासबुक दिले जाणार आहे. त्याला जाणीवपूर्वक ‘पासबुक' असे नाव देण्यात आले आहे. ज्या पध्दतीने बँकेच्या पासबुक मध्ये खात्यात जमा असलेल्या धन राशीची नोंद केली जाते. त्याच पध्‌दतीने या उपक्रमाच्या माध्यमातून त्या ज्ञानाचे जे संचित विद्यार्थ्यांना मिळेल त्याची नोंद पासबुकमध्ये त्यांनी स्वतः करायची आहे. वाचलेल्या पुस्तकाबद्दल अभिप्राय लिहिणे अपेक्षित आहे. या अभिप्रायाला शब्द मर्यादा नाही. अगदी पुस्तक मला आवडले इथपासून त्या पुस्तकाबद्दल त्याला जे वाटते, ते त्याने पुस्तकात लिहावे. वाचनाच्या माध्यमातून या पासबुक मध्ये फक्त जमा (क्रेडीट) नोंदी असतील. वजा (डेबीट) नोंद होणार नाही, अशी यातील लक्षणीय गोष्ट असल्याचे आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

वाचनामुळे विचारांच्या कक्षा रुंदावतात. परिपूर्ण व्यक्तिमत्त्व तयार होण्यासाठी आणि जगभरातील अत्याधुनिक बाबींची जाण होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे लिखाणामुळे वाचलेल्या गोष्टी डोक्यात अधिक पक्क्या होतात. त्याबाबत प्रगल्भता निर्माण होते व त्या बाबी अंगीकारणे अधिक सोपे होते. त्यामुळेच वाचनाबरोबरच लिखाणाची गोडी लागावी म्हणून ‘चला वाचूया' उपक्रम महत्त्वाचा आहे. -अभिजीत बांगर, आयुवत-ठाणे महापालिका. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

पनवेल महानगरपालिका शाळांचा क्षेत्र भेट उपक्रम