‘अश्वमेध महायज्ञ'च्या हवन कुंड प्रकटीकरणासाठी विशेष पुजा संपन्न

खारघर : ‘अखिल विश्व गायत्री परिवार'च्या वतीने खारघर सेंट्रल पार्क मैदानामध्ये ४७ व्या ‘अश्वमेध महायज्ञ'चे आयोजन करण्यात आले आहे. २१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत अश्वमेध महायज्ञ होणार आहे. सदर अश्वमेध महायज्ञ स्थळ २४० एकर मध्ये आहे. या ‘अश्वमेध महायज्ञ'साठी ४ फेब्रुवारी रोजी ‘महायज्ञ'च्या हवन कुंडाच्या प्रकटीकरणाची विशेष पुजा करण्यात आली. यावेळी ‘शांतिकुंज हरिद्वार'च्या महान विद्वानांनी सनातन वैदिक पध्दतीनुसार विधी केले. तसेच ५ जोडप्यांचे पुजन करुन आणि वैदिक पध्दतीने ‘महायज्ञ'साठी प्रारंभिक कुंड उघडून ‘अश्वमेध महायज्ञ'साठी यज्ञशाळेच्या उभारणीचे काम सुरु करण्यात आले. याप्रसंगी ‘मुंबई अश्वमेध महायज्ञ'चे समन्वयक मनुभाई पटेल, शरद पारधी, परमंद द्विवेदी, आदि उपस्थित होते.

‘अश्वमेध महायज्ञ'मध्ये १००८ कुंड असणार असून प्रत्येक कुंडात १० जण मिळून हवन करणार आहेत. अशा प्रकारे एकाच वेळी १० हजारांहुन अधिक लोक यज्ञात हवन करणार आहेत. ११०० उपाचार्यांना हवन कुंडाची देखभाल आणि योग्य व्यवस्था करण्यासाठी उच्चस्तरीय प्रशिक्षण दिले जात आहे. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता देवपुजन सुरु होऊन ते दुपारी २ वाजेपर्यंत चालेल. हिमालयाच्या छायेत आणि ऋषी विश्वामित्रांचे तपस्थान असलेल्या शुध्द गंगेच्या कुशीत प्रदीर्घ काळापासून अभ्यास करणारे महान विद्वान यज्ञ करणार आहेत, अशी माहिती ‘अश्वमेध महायज्ञ'चे समन्वयक शरद पारधी यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.

पुज्य डॉ. प्रणव पंड्या, ‘अखिल विश्व गायत्री परिवार'चे नेतृत्व करणाऱ्या पुज्य शैलदीदी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मवादिनी भगिनींच्या आचार्यांचा एक वेगळा संघ असणार आहे. ‘अश्वमेध महायज्ञ'मध्ये सर्व जाती-पंथांसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असेल. प्रत्येक व्यक्ती आपल्या भक्तीनुसार या हवनात सहभागी होऊ शकते. ‘महायज्ञ'दरम्यान ४ हजारांहून अधिक जोडपी एकत्र पुजेत सहभागी होणार आहेत, असे शरद पारधी म्हणाले.

‘अश्वमेध महायज्ञ'मध्ये माता भगवतीदेवी भोजनालय या नावाने ४ भोजनालय (महाप्रसाद कक्ष) असणार आहेत. प्रत्येक भोजनालयात प्रतिदिन ८० हजारांहून अधिक भाविकांना महाप्रसाद उपलब्ध होणार आहे. संभाजीनगर, श्रीरामपुरम, मीराबाईनगर, एकनाथनगर, संत ज्ञानेश्वरनगर आदि नावाने एकूण ८ शहरे स्थापन केली जाणार आहेत. येथे विविध प्रांतातून आलेल्या भाविकांची रहाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबईत विविध दिव्य तीर्थक्षेत्रे आणि हिमालयातील दिव्य तीर्थक्षेत्रांची झलक प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. तसेच ‘सनातन संस्कृती'च्या प्रवर्तकांचे भव्य आणि विहंगम पुतळे पहायला मिळणार आहेत. ‘देवसंस्कृत विद्यापीठ'चे प्र-कुलगुरु डॉ. चिन्मय पंड्या यांच्या मार्गदर्शनाखाली याचे बांधकाम चालू आहे. सदर ठिकाणी सांस्कृतिक कला मंच असणार असून येथे विविध सांस्कृतिक सादरीकरणे होणार आहेत. तसेच ‘विचार मंच'च्या माध्यमातून समाजसेवेत रमलेल्या विविध व्यक्तिमत्त्वांचे विचार जाणून घेतले जाणार आहेत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘ग्रँड सेंट्रल पार्क'चे उद्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण