शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश गरजेचा -राज्यपाल

नवी मुंबई : विश्वशांतीसाठी आंतरिक शांती, राष्ट्रांमध्ये परस्पर शांती तसेच पर्यावरण शांती असणे आवश्यक आहे असे सांगून चारित्र्यवान पिढी निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश करणे नितांत आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी वाशी येथे केले.

दरम्यान, स्नातकांनी शिक्षण केवळ नोकरी अथवा चरितार्थ अर्जनासाठी न घेता ते चारित्र्य संपन्न व्यवतीमत्व घडण्यासाठी घेतले तरच भारत विश्वगुरु होईल, असा विश्वासही राज्यपालांनी व्यवत केला.

जैन विश्वभारती या अभिमत विद्यापीठाचा चौदावा दीक्षांत सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत १९ फेब्रुवारी रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्र येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

दीक्षांत समारोहाला जैन तेरापंथ संप्रदायाचे प्रमुख आचार्य महाश्रमण, ‘जैन विश्वभारती विद्यापीठ'चे कुलपती तथा केंद्रीय विधी-न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, ‘विद्यापीठ'चे कुलगुरू बच्छराज दुगड, ‘जैन विश्वभारती'चे अध्यक्ष अमरचंद लुंकड, जैन साधू-साध्वी तसेच स्नातक उपस्थित होते.

जैन धर्माने नेहमीच शांती, अहिंसा आणि सामोपचाराचा पुरस्कार केला आहे. जैन धर्माची शिकवण आजच्या जगात पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल होत असून युवकांनी नाविन्यतेच्या माध्यमातून नव्या वाटा शोधाव्या आणि आपल्या सामर्थ्याचे योग्य नियोजन करावे, असे राज्यपाल बैस यांनी सांगितले.

राज्यपालांनी यावेळी जैन तेरापंथ संप्रदायाचे प्रमुख आचार्य तुलसी, आचार्य महाप्रज्ञ तसेच विद्यमानआचार्य महाश्रमण यांच्या मानवसेवा कार्याचा गौरव केला.  

संस्कार आणि मूल्य शिक्षणाशिवाय मनुष्य निर्माण कार्य होणार नाही. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०' मध्ये मूल्य शिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला असल्याचे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले. स्नातकांनी राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य द्यावे असे सांगतानाच ‘जैन विश्वभारती विद्यापीठ'ने राष्ट्रीय पांडुलिपी मिशन सफल करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आचार्य महाश्रमण यांचा युवकांना मूलमंत्र...
मनुष्य जीवनात ज्ञानाचे फार महत्व आहे. ज्ञानाइतकी दुसरी पवित्र गोष्ट नाही. यासाठी स्नातकांनी ज्ञानसाठी समर्पित व्हावे, असे आचार्य महाश्रमण यांनी यावेळी आपल्या संबोधनात सांगितले.

ज्ञानप्राप्तीमध्ये अहंकार, क्रोध, प्रमाद, रोग आणि आळस मुख्य अडथळे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, अहिंसा, नीतिमत्ता, संयम आदि गुणांचा विकास व्हावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिओ फिनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष कुंदापूर वामन (के. व्ही.) कामत, वेद आणि जैन आगम शास्त्राचे अभ्यासक प्रा. दयानंद भार्गव यांना मानद डिलीट पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्यात विविध विद्या शाखांमधील पीएचडी स्नातकांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

माझी वसुंधरा अंतर्गत आठ महाविद्यालयांशी महापालिकेचा सामंजस्य करार