पावसाळा कालावधीत विविध प्राधिकरणांनी परस्पर समन्वयाने काम करावे
एपीएमसी बाजारात ५० किलो वजनाचा तिढा कायम ?
नवी मुंबई-: वाशीतील कृषी उत्पन्न बाजार आवारात ५० किलो पेक्षा जास्त वजनाच्या शेतमाल गोण्या हाताळण्यास माथाडी कामगारांकडुन नकार दिला जात आहे. आणि याबाबत वारंवार कामबंद आंदोलन, बैठका घेऊन देखील अजून पर्यत कार्यवाही राबवण्यात आली नाही. त्यामुळे माथाडी कामगारांनी परत एकदा ५० किलो पेक्षा जास्त वजनाच्या शेतमालाची हाताळणी करण्यास नकार दिला.त्यामुळे बाजार आवारात बऱ्याच गाड्या उभ्या असतात. आणि याचा फटका व्यापाऱ्यांना देखील बसत आहे.त्यामुळे हा तिढा सुटत नाही म्हणून सोमवारी व्यापाऱ्यांनी देखील आपला व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून बाजारात एक ही गाडी आवक मागविली जाणार नाही.
कृषी उत्पन्न बाजार आवारातील कांदा बटाटा बाजारात आवक होणाऱ्या शेतमाल ५० किलोपेक्षा जास्त आल्यास त्याची चढ उतार करणार नाही असा पवित्रा माथाडी कामगारांनी घेतला आहे.आणि याबाबत वेळोवेळी काम बंद आंदोलने करण्यात आली आहेत. आणि आश्वासनानंतर काम सुरु करण्यात येत होते. मात्र परिस्थिती जैसे थे वैसेंच राहीली आहे.त्यामुळे बाजारात सोमवार पासून ५० किलोहून अधिक वजनाचा शेतमाल पडून आहे. ५० किलोपेक्षा जास्त वजनाचा माल बाजारामध्ये विक्रीसाठी आल्यानंतर माथाडी कामगारांकडून त्या शेतमालाची हाताळणी, चढउतार होत नाही आहे. त्यामुळे आतापर्यंत जवळपास ३५ ते ४० वाहने उभी आहेत . त्यामुळे शेतमालाचे नुकसान होत आहे , तसेच मालाची प्रत खराब होवून शेतकऱ्यांस बाजारभाव कमी मिळत असून हे शेतकऱ्याचे नुकसान आहे. अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण देश व महाराष्ट्रामध्ये ५० किलो वजनाच्या शेतमालाची मर्यादा पाळली जात नाही. इतर बाजार समितीत याच शेतमालाची हाताळणी होत आहे, मात्र येथील बाजारात ५० किलोपेक्षा अधिक मालाची हाताळणी होत नाही. येथील व्यापाऱ्यांवर हा अन्याय होत आहे. ग्राहक यांनी खरेदी केलेला माल खासगी वाहनांतून घेऊन जाण्यास प्रतिबंध होत आहे. त्यामुळे अडत व्यापारी, सभासद यांना जबाबदार धरले जात असून बाजार समिती नोटीस बजावत आहे. या कारवाईचा कांदा बटाटा अडत व्यापारी संघ निषेध करीत असून सोमवारी बाजारातील अडत आवक न मागवित व्यवसाय बंद आंदोलन करणार आहे.