उद्यानातील सुरक्षारक्षक केबिन्सना वीज पुरवठा करण्याची ‘मनसे'ची मागणी
नवी मुंबई : नवी मुंबई मधील उद्यानात असलेले लाखो रुपये किंमतीच्या सुरक्षारक्षक केबिन्स वीज पुरवठ्याअभावी स्या धुळखात पडून आहेत. त्यामुळे या सुरक्षारक्षक केबिन्सला तातडीने वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्याची मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'चे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नवी मुंबई मधील उद्यानात कार्यरत असणाऱ्या सुरक्षारक्षकांचे ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण व्हावे म्हणून प्रत्येकी ३ ते ३.५ लाख रुपये खर्च करुन सुरक्षारक्षक केबिन्स उभारण्यात आल्या आहेत. परंतु, ७-८ महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही उद्यान विभाग आणि विद्युत विभागाच्या दुर्लक्षतेमुळे या सुरक्षारक्षक केबिन्सना अद्यापही वीजपुरवठा करण्यात आला नाही. परिणामी, सदर केबिन्स वापर न झाल्यामुळे धुळखात पडल्या आहेत. काही केबिन्सना महापालिकेच्या विद्युत खांबांमधून तात्पुरता वीजपुरवठा करण्यात आला आहे. परंतु, त्याचा वापर फक्त संध्याकाळी करता येतो. यामागे प्रशासनाची उदासीनता दिसून येते. यामुळे उद्यानातील सुरक्षारक्षकांची गैरसोय होत आहे, असे ‘मनसे'चे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी महापालिका आयुवतांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, सदर समस्येबाबत आयुक्त डॉ. कैलस शिंदे यांची भेट घेतल्यानंतर विद्युत विभागाने सुरक्षारक्षक केबिन्सला वीज पुरवठा देण्यासंदर्भात हालचाली सुरु केल्या आहेत. आयुवत डॉ. शिंदे यांनी अभियांत्रिकी विभागाला केबिन्सचे टेस्ट रिपोर्टस् सादर करण्यास सांगितले असून त्यानंतर लवकरात सुरक्षारक्षक केबिन्सना वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले असल्याचे सविनय म्हात्रे यांनी सांगितले.