स्वच्छता अधिकाऱ्यांची मानसिक त्रासातून मुक्तता करण्याची मागणी

कचरा विलगीकरणाची जबाबदारी कचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांची

नवी मुंबई ः सुका कचरा आणि ओला कचरा या प्रकाराची जबाबदारी कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराला सोपवून स्वच्छता अधिकारी, स्वच्छता अधिकारी स्वच्छता निरीक्षक आणि उप स्वच्छता अधिकाऱ्यांची मानसिक त्रासातून मुक्तता करण्याची मागणी ‘नवी मुंबई इंटक'चे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.

महापालिका प्रशासनाकडून गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांना कचरा विलगीकरण करण्यास सांगितले जात आहे. विलगीकरणामुळे रहिवाशांनी सोसायटी आवारातील कचऱ्याचे सुका आणि ओला असे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. तरीही सोसायटी आवारातील रहिवाशी कचरा विलगीकरण करत नसल्याने कचरा संकलन करणारे कर्मचारी आणि ठेकेदार संबंधित कचरा घेवून जात नाही. दोन दिवस कचरा घेवून न गेल्यास सोसायटी आवारात कचऱ्याचे ढिगारे तयार होतात. परिणामी, रहिवाशी सामाजिक कार्यकर्त्यांकडे अथवा माजी नगरसेवकांकडे या प्रकाराची तक्रार करतात. यानंतर माजी नगरसेवक अथवा सामाजिक कार्यकर्ते स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि उप स्वच्छता अधिकाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की करत कचरा घेवून जाण्यास भाग पाडतात. यामुळे अनेकदा स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि उप स्वच्छता अधिकाऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झालेला आहे. कचरा सोसायटीचा आणि वाहून नेण्याची जबाबदारी कचरा संकलन तसेच वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराची असतानाही यामध्ये स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि उप स्वच्छता अधिकारी मधल्या मध्ये भरडला जात असल्याची बाब कामगार नेते रविंद्र सावंत यांनी सदर निवेदनातून महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

घनकचरा व्यवस्थापनासाठी ठेकेदाराकडून अतिरिक्त कचरा कॉम्पॅक्टर आणि टाटा-एस वाहतूक करणाऱ्या गाड्यांची आवश्यकता आहे. परंतु, असणाऱ्या गाड्याच नादुरुस्त वेळोवेळी होतात. त्यामुळे येथील स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि उप स्वच्छता अधिकाऱ्यांना सकाळपासून संध्याकाळ पर्यंत थांबून नादुरुस्त गाडी रुटवर आणून कचरा उचलून घेतल्यानंतरच जबाबदारीतून मुवत व्हावेे लागते. सदरचा सतत होणारा रोज होणारा मानसिक तसेच शारीरिक छळ सर्व स्वच्छता निरीक्षक यांना भोगावा लागत आहे. अतिरिक्त वाहन नसल्यामुळे आहे त्या वाहनांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या करुन घेताना स्वच्छता निरीक्षक यांची दमछाक होत आहे. परिणामी, सर्व लोकप्रतिनिधींच्या तसेच नागरिकांच्या रोषाचा सामना स्वच्छता निरीक्षक यांना करावा लागत आहे. त्याचबरोबर विभाग कार्यालयामधून अनेक नाहक कामे स्वच्छता निरीक्षक यांनाच सोपवून त्याची जबाबदारी निश्चित केली जाते. सदर सर्व प्रकारात स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि उप स्वच्छता अधिकारी मोठ्या प्रमाणावर भरडला जात आहे. त्यामुळे या घटकाला दिलासा देणे आवश्यक असल्याचे रविंद्र सावंत यांनी सदर निवेदनात म्हटले आहे.

वास्तविक पाहता कचरा विलगीकरणाची जबाबदारी कचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराची आहे. सोसायटीतील रहिवाशांना प्रशासनाकडून वरचेवर डब्बे पुरविले जात नाहीत. जुनाट आणि तुटक्या कचराकुंड्यामध्येच कचरा जमा करावा लागतो. याशिवाय कचरा वाहतूक करणारी वाहने जुनाट झाल्याने त्यातील कचरा गाडी जाताना रस्त्यावर पडतो. परिणामी, बकालपणात वाढ होवून स्थानिक रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यासाठी कचरा वाहतूक करणाऱ्यांनाच कचरा विलगीकरणाचे निर्देश द्यावेत. सकाळी ८ ते रात्री ८-१० वाजेपर्यत स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि उप स्वच्छता अधिकारी काम करीत असतात. रस्ते, पदपथ, सोसायटी बाहेरील आवार येथे कोठे कचरा तर नाही ना, कचरा कुंड्या बाहेर नाहीत ना याची सतत पाहणी करण्यात येते. या पार्श्वभूमीवर कचरा विलगीकरणाची जबाबदारी कचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांकडे वर्गीकृत करुन स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि उप स्वच्छता अधिकाऱ्यांची होणाऱ्या मानासिक त्रासातून मुक्तता करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुवतांकडे केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई भाजपाच्यावतीने तिरंगा जागृती बाईक रॅली