उरण-पनवेल मार्गावर एसटी, एनएमएमटीची सेवा होणार सुरळीत

बोकडवीरा ग्रामस्थांची ‘सिडको'च्या द्रोणागिरी नोड कार्यालयावर धडक

उरण : उरण तालुक्यातील ‘सिडको'च्या द्रोणागिरी नोड कार्यालयावर विविध मागण्यांसाठी बोकडवीरा ग्रामस्थांनी धडक दिली. उरण पनवेल मार्गावरील हाईट गेट हटवावे, गेटमुळे अपघात झालेल्यांना नुकसानभरपाई द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. सदर मागण्यांवर सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग यांच्यात पाच तास सकारात्मक चर्चा होऊन मागण्या संबंधित प्रशासनाकडून मान्य करण्यात आल्या आहेत.

उरण-पनवेल मार्गावरील फुंडे हायस्कुल जवळ येथील हाईट गेटला धडकल्याने टेम्पोचा अपघात झाला आहे. या अपघातावेळी टेम्पो मागे असलेल्या दुचाकीवरील बोकडवीरा गावातील अंकुश पाटील आणि त्यांची सात वर्षाची मुलगी मनविता यांचाही अपघात झाला. या अपघातात बापलेक दोघ्ोही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ‘सिडको'ने आर्थिक मदत करावी. तसेच अपघातांना जबाबदार असलेले हाईट गेट मोकळे करावेत या दोन प्रमुख मागण्यांसाठी बोकडवीरा ग्रामस्थांनी २८ ऑगस्ट रोजी ‘सिडको'वर मोर्चा काढला होता.

हाईट गेटमुळे या मार्गावर झालेला आतापर्यंतचा १९ वा अपघात आहे. अशा प्रकारच्या बोकडवीरा येथील हाईट गेटच्या टेम्पो अपघातात कोट गावातील एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे वाढत्या अपघातामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच एसटी आणि एनएमएमटी सारखी प्रवासी वाहने बंद असल्याने बोकडवीरा, फुंडे, डोंगरी आणिपाणजे या गावातील विद्यार्थी आणि कामगारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत.

२०२१ पासून ‘सिडको'च्या द्रोणागिरी नोड कार्यालय आणि फुंडे स्थानकालगतच्या नादुरुस्त खाडीपुलामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील जड आणि प्रवासी वाहने रोखण्यासाठी उरण-पनवेल मार्गावर हाईट गेट बसविले आहेत. बोकडविरा आणि फुंडे महाविद्यालयाजवळील दोन्ही बाजुच्या हाईट गेटमुळे अधिक उंचीच्या वाहन चालकांना उंचीचा अंदाज न आल्याने वाहनांचे अपघात होऊ लागले आहेत.

दरम्यान, पाच तासांच्या बैठकीत ‘सिडको'चे अधिकारी हनुमंत नहाने, एम. एम. मुंढे, नायब तहसीलदार बी. जी. धुमाळ, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नरेश पवार, आदि अधिकारी तसेच बोकडवीरा ग्रामपंचायत सरपंच अपर्णा मनोज पाटील, कामगार नेते भूषण पाटील, विजय पाटील, संतोष पवार यांच्यासह माजी सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच संबंधित प्रशासनाकडून मागण्या मान्य झाल्याने आता उरण-पनवेल रस्त्यावर प्रवासी बस आणि एनएमएमटी धावणार असल्याने जनतेने समाधान व्यक्त केले आहे. 

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

शेतकर्‍यांना अल्प मोबदल्यात, सुवीधांपासून वंचित ठेवून गुंडाळण्याचा शासनाचा प्रयत्न