आचार्य अत्रे यांच्या जयंती निमित्त ठाणे महापालिका तर्फे विचारमंथन व्याख्यानमालेचे आयोजन

प्रतिभेच्या दहामुखांनी भरभरून देणारे आचार्य अत्रे अफाट व्यक्तीमत्व -  श्रीकांत बोजेवार

ठाणे : आपल्या असामान्य लेखन कर्तृत्वाने आणि विलक्षण प्रतिभेने  मराठी साहित्य विश्वात मुशाफिरी करणारे, शिक्षक, कवी, गीतकार, विनोदकार, पटकथाकार, विडंबनकार, नाटककार, वक्ता, चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार, बालवाङमयकार, शिक्षणतज्ञ अनुवादक, राजकीय पुढारी आणि पत्रकार म्हणून ज्यांनी केलेली कामगिरी अजोड ठरली, त्या आचार्य अत्रे यांनी केलेल्या या भूमिका लार्जर दँन लाईफ होत्या. अशा या अष्टपैलू आचार्य अत्रे यांचे वर्णन करताना अफाट शब्द योग्य ठरतो. त्यांनी महाराष्ट्राला प्रतिभेच्या दहामुखांनी भरभरुन दिले, असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ पत्रकार, लेखक श्रीकांत बोजेवार यांनी ठाणे येथे काढले.

ठाणे महापालिका तर्फे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जयंती निमित्ताने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित विचारमंथन या व्याख्यानमालेत ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांनी ‘आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे व्यक्तिमत्त्व आणि विचार'  या विषयावर आपले विचार मांडले. यावेळी ठाणेकरांच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी श्रीकांत बोजेवार यांचे ग्रंथबुके, शाल आणि त्यांचे रेखाचित्र देवून स्वागत केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त-२ प्रशांत रोडे उपस्थिथत होते. तर कार्यक्रमास कवयित्री अनुपमा उजगरे, ‘आनंद विश्व गुरुकुल'चे विश्वस्त प्रा. प्रदीप ढवळ, चित्रकार किशोर नादावडेकर, नवी मुंबई महापालिका जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, ‘जोशी बेडेकर महाविद्यालय'चे ग्रंथपाल नारायण बारसे, ‘प्रभात चित्र मंडळ'चे अध्यक्ष संतोष पाठारे, ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान, ‘समर्थ सेवक मंडळ'चे अध्यक्ष डॉ. चैतन्य साठे, ईएनटी सर्जन डॉ. प्रदीप उप्पल, आदि उपस्थित होते.

आचार्य अत्रे यांचा मूळ पिंड शिक्षकाचा. त्यांना ‘आचार्य' पदवी याच क्षेत्राने मिळवून दिली. मुंबईत काही दिवस शिक्षकाची नोकरी केल्यानंतर ते पुण्याला ‘कॅम्प एज्युकेशन सोसायटी'च्या शाळेत महिना ३५ रुपये एवढ्या पगारावर हेडमास्तर म्हणून नोकरीला लागले. पुढे त्यांनी बीटी शिक्षणशास्त्राची पदवी घेतली, लंडनला जाऊन टीचर्स डिप्लोमाही केला. ‘कॅम्प एज्युकेशन सोसायटी'चा अत्रे यांनी केलेला कायापालट, मुलींच्या शिक्षणासाठी काढलेली आगरकर हायस्कूल त्यांची शिक्षण क्षेत्रातील कामे महत्त्वाची असली, तरी ती पुण्यापुरती मर्यादित होती. मात्र, प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी लिहिलेली ‘नवयुग वाचनमाला' आणि दुय्यम शाळेसाठीची ‘अरुण वाचनमाला' अशी क्रमिक पुस्तके म्हणजे मराठी भाषेवर उमटलेला खास ‘अत्रे ठसा' होय. लंडनला गेले असता, तेथील क्रमिक पुस्तके पाहून त्यांना आपल्या येथील पुस्तकांचे तोकडेपण लक्षात आले. परत आल्यावर त्यांनी रटाळ सरकारी क्रमिक पुस्तकांची कल्पना मोठ्या प्रयासाने मोडीत काढली. त्यानंतर साधारण पंचवीस वर्षे महाराष्ट्रातील विद्यार्थी वर्ग ‘नवयुग वाचनमाला'च्या बौध्दिक खुराकावर पोसला गेला, असे बोजेवार म्हणाले.

अत्रे यांनी लिहिलेली विनोदी नाटके मानवी वृत्ती-भाष्य करणारी आहेत. ती त्यांच्या खास विनोदी शैलीमुळे, हास्यस्फोटक प्रसंगांमुळे आणि संवादांमुळे कोणत्याही काळात तेवढीच हसवतात, अंतर्मुख करतात. साष्टांग नमस्कार सह भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी, मोरुची मावशी, कवडीचुंबक, पराचा कावळा, मी उभा आहे अशी विनोदी नाटके, तो मी नव्हेच, घराबाहेर, उद्याचा संसार, जग काय म्हणेल, प्रीतीसंगम, पाणिग्रहण अशी इतर वेगवेगळ्या प्रवृत्तीची नाटके अत्रेंनी लिहिली. १९३५ मध्ये अत्रेंनी लिहिलेल्या  घराबाहेर या नाटकाला होत असलेली गर्दी पाहून त्यांना हाऊसफुल्ल शब्द सुचला आणि त्यांनी तो जाहिरातीत वापरला, असेही बोजेवार यांनी सांगितले.

माटे- अत्रे, फडके- अत्रे, ठाकरे-अत्रे, वरेरकर-अत्रे अशा अनेक वादांमध्ये अत्रे यांनी वापरलेली भाषा, केलेल्या कोट्या बरेचदा सभ्य पत्रकारितेच्या चौकटीत न बसणाऱ्या होत्या. सदर सगळे केवळ अत्रे म्हणून लोकांनी चालवून घेतले. ते ज्या लोकांचे वाभाडे काढत, त्या व्यक्तींमधील गुणांचेही त्यांना नेमके भान असे, जाण असे. तशी वेळ आली, तर ते त्याच व्यक्तीला डोक्यावर घेऊन नाचत, याचीही शेकडो उदाहरणे असल्याचे बोजेवार यांनी नमूद केले. १९५५ ते १९६० या काळातले अत्रे आक्रमक चैतन्याचा धबधबाच होता. त्या धबधब्याचे काहींवर तुषार उडाले, काहींवर शिंतोडे उडाले, काही त्यात चिंब भिजले, तर काहींच्या नाका-तोंडात पाणी गेले. त्यांचा स्नेह, त्यांचा रोष, त्यांचे राग-लोभ सगळेच टोकाचे असे आणि अनेकदा ते तात्पुरते असे.

आप्तस्वकीयांचे मृत्यू, पुरस्कार, टीका, कौतुक आणि आयुष्याकडून भरभरुन घेण्याची, त्याला भरभरुन देण्याची मनस्वी वृत्ती अत्रे यांच्या वाट्याला. सगळेच कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्राचा पाचवा खंड प्रकाशित झाल्यावर अवघ्या दहा महिन्यांनी, १३ जून १९६९ रोजी वयाच्या ७१व्या वर्षी आचार्य अत्रे यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांनी उलगडलेला आचार्य अत्रे यांचा प्रवास ऐकताना जणू सर्व सभागृहच अत्रेमय झाले होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी