पावसामुळे कांदा भिजला; शेतमाल फेकण्याची नामुष्की
वाशी ः मागील एक आठवडाभर राज्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. या पावसाचा पिकावर परिणाम होऊन शेतमाल उत्पादन घटत असताना आता कांदा वाहतुकी दरम्यान देखील शेतमाल भिजण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा मार्केटमध्ये कांदा आवक देखील घटली असून, भिजलेला कांदा खराब होत असल्याने त्यास ग्राहक मिळत नाही. परिणामी भिजलेला कांदा फेकण्याची वेळ शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर आली आहे.
वाशी मधील एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमध्ये १७ सप्टेंबर रोजी पावसामुळे ७८ गाडी कांदा आवक झाली होती. मात्र, त्यापैकी बहुतांश वाहनांत भिजलेला कांदा आला होता. त्यामुळे या कांद्याला ग्राहक नसल्याने १०० गोणी म्हणजे जवळपास साडेपाच टन कांदा फेकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली. तर १७ सप्टेंबर रोजी एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात उच्चतम कांद्याला १५ ते १६ रुपये प्रतिकिलो तर मध्यम आणि सर्वसाधारण कांद्याला ५ ते १० रुपये प्रतिकिलो दर मिळाला.