मत्स्य अभियांत्रिकी पदवीधरांनी मांडली मत्स्यव्यवसाय मंत्र्यांसमोर आपली कैफीयत
मत्स्य अभियांत्रिकी पदवीधरांना न्याय मिळण्यासाठी दशरथ भगत यांचे ना.सुधीर मुनगंटीवार यांना साकडे
नवी मुंबई ः मत्स्य अभियांत्रिकी पदवीधरांचा रोजगार कायम ठेवणे, अनुभव असलेल्यांना रोजगारात मत्स्य व्यवसाय विभागाने प्रथम प्राधान्य देणे, मस्त्य व्यवसायावरील अवलंबित विविध घटकांना उचित न्याय देणे, त्यांना कायम उत्पन्नाचे स्त्रोेत निर्माण करणे आणि डिप्लोमा इन फिशरींग इंजिनिअरींग पदवीधर तरुणांना सागर मित्र या पदावर कायम करण्याची मागणी नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली मूळ मच्छीमार भूमीपुत्र विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
यावेळी पदवीधर विद्यार्थी दुर्वेश म्हात्रे, ज्योती केणी, जन्मेष तरे, रुचिता पगधारे, अनिषा मंचेकर, हर्ष पगधारे, आदिंनी आपल्या मागणीचे निवेदन ना. सुधीर मुनगंटीवार यांना दिले. तर दशरथ भगत यांनी सदर विद्यार्थ्यांची कैफीयत ना. मुनगंटीवार यांच्यासमोर विस्तृतपणे मांडली. सदर बेरोजगार विद्यार्थ्यांनी नैराश्य जीवन जगण्याऐवजी त्यांचे जीवनमान सुरळीत होण्याकरिता संबंधित विभागाला योग्य ते आदेश देण्याची विनंतीही दशरथ भगत यांनी मत्स्यव्यवसाय मंत्र्यांना केली.
मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम शिरगांव-रत्नागिरी येथील मुख्याध्यापकांच्या पत्रानुसार मत्स्य क्षेत्र प्रगणक आणि सांख्यिकी अन्वेक्षक या पदासाठी निश्चित केलेल्या अटी-शर्ती या शिक्षण, प्रशिक्षण आणि अनुभव याबाबत भिन्न आहेत. त्यासाठी सदर पदवीधारकांनी घेतलेले शिक्षण, प्रशिक्षण आणि अनुभवानुसारच अटी-शर्ती कराव्यात. महाराष्ट्र
शासनाचा ३ वर्ष कालावधीचा मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून पूर्ण केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी. सदर पदवीधरांना सांख्यिकी अन्वये तसेच मस्त्यक्षेत्र प्रगणक या पदासाठी पात्र करा. त्यांना सागर मित्र तसेच मस्त्यक्षेत्र प्रगणक या पदासाठी प्राधान्याने पात्र ठरवले जावे. यापूर्वी सागर मित्र पदावर संदर्भित पदवीधर विद्यार्थी यांनी कामे केली आहेत. त्यांना पुन्हा त्याच पदावर कायम रुजू करुन घ्यावे. परंतु, जाचक आणि किमान समान वेतन नियमबाह्य आऊट सोर्सिग रोजगार नसावेत . सागरी मित्र म्हणून मत्स्य विभागात काम केलेल्या विद्यार्थ्यांचे थकीत पगार देण्यात यावा, आदि मागण्या या विद्यार्थ्यांच्या वतीने दशरथ भगत यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केल्या आहेत.