‘स्वच्छ सर्वेक्षण' अंतर्गत रंगली ‘स्वच्छंद काव्य संगीत संध्या'

 नवी मुंबईची ‘कवितांचे शहर' म्हणून ओळख -आयुवत नार्वेकर

नवी मुंबई : स्वच्छ आणि सुंदर शहर अशी नवी मुंबईची ओळख असून केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण'मध्ये नवी मुंबई महापालिकेने नेहमीच राज्यात प्रथम क्रमांक कायम राखला असून देशातील मानांकन सतत उंचावत ठेवले आहे. यावर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'ला सामोरे जाताना ‘निश्चय केला, नंबर पहिला' असे ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महापालिका ‘स्वच्छ सर्वेक्षण'ला सामोरी जात आहे. महापालिकेच्या आणि नवी मुंबईकर नागरिकांच्या या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक तथा निर्माते जयू भाटकर यांच्या ‘वैष्णो व्हिजन' या कलानिर्मिती संस्थेच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३' अंतर्गत ‘स्वच्छंद काव्य संगीत संध्या' आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कवी प्रा.अशोक बागवे, अरुण म्हात्रे, डॉ.महेश केळुसकर आणि संगीतकार कौशल इनामदार असे नामांकित साहित्यिक, कलावंत सहभागी झाले होते.

दरम्यान, सदर कार्यक्रमात मनोगत व्यवत करताना आयुवत राजेश नार्वेकर यांनी ‘स्वच्छ कवी संमेलन'मुळे नवी मुंबईची ओळख ‘कवितांचे शहर' म्हणून होऊ लागली असल्याबद्दल आनंद व्यवत केला.

‘घनकचरा अन ओला कचरा रोज करु वेगळा, नियमाने वागता तुम्हाला मान मिळे आगळा, पाठ शुध्द पर्यावरणाचा आमच्याकडूनी शिका, सांगत आहे तुमची आमची नवी मुंबई महापालिका' अशा शब्दात कवी अरुण म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत करीत असलेल्या कामाची महती सांगितली आणि ‘स्वच्छंद काव्य संगीत संध्या' एकाहून एक सरस कवितांनी उत्तरोत्तर रंगत गेली.

संगीतकार कौशल इनामदार यांच्या अत्यंत गाजलेल्या कविवर्य सुरेश भट लिखित ‘'लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी' या मराठी भाषा अभिमान गीताने सुरु झालेल्या मैफिलीत ‘कवी बोलतो जेव्हा प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं, कवी बोलतो जेव्हा प्राणातून तेव्हा आपण कवितेसारखं बसायचं' या कवी आणि रसिक यांच्यामधील नाते अधोरेखित करणाऱ्या प्रा. अशोक बागवे यांच्या कवितेने रसिकांना साद घातली आणि ‘स्वच्छंद काव्य संगीत संध्या' श्रोत्यांच्या ‘वाहव्वा!, क्या बात है!' अशा अभिप्रायांची आणि उत्स्फुर्त टाळ्यांची दाद घेत बहरत गेली.

डॉ. महेश केळुसकर यांच्या खास मालवणी बोलीतील ‘तीळफुलाच्या शेतात' या कवितेने कोकणची काव्यसफर घडविली तसेच त्यांच्या ‘झिनझिनाट' या अत्यंत गाजलेल्या कवितेच्या खास ढंगातील सादरीकरणाने रसिकांना भुरळ घातली.

अरुण म्हात्रे यांच्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे' या कवितेने श्रोत्यांना नॉस्टेल्जिक बनविले. त्याचप्रमाणे त्यांच्या नव्याकोऱ्या पाऊस कवितेने  श्रोत्यांना प्रेक्षागृहात बसून पावसात भिजण्याचा अनुभव दिला.

प्रा. अशोक बागवे यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई शहर ज्या पध्दतीने प्रयत्न करीत आहे, ते बघता नवी मुंबईचा देशात पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर ठरण्याचा निश्चय प्रत्यक्षात येईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी सादर केलेल्या ‘नदीच्या किनारी नदीला म्हणावे' या  गझल स्वरुपातील नदीच्या प्रार्थनेला रसिकांनी प्रचंड दाद दिली.

कौशल इनामदार यांनी मंचावर उपस्थित तिन्ही कवींच्या गीतकाव्यरचना अप्रतिम शैलीत सादर केल्या. प्रा.अशोक बागवे लिखित ‘वासाचा पयला, पाऊस अयला' या संगमेश्वरी बोलीतील गीतकाव्यासोबत रसिकांनी टाळ्यांचा नाद धरला. अरुण म्हात्रे यांचे ‘स्पंदनांचे नेटके घर बांधतो पाऊस हा' असे गीतकाव्य चिंब भिजवून गेले. डॉ. महेश केळुसकर लिखित ‘रानात झिम्म पाऊस उन्हाला फूस तुझ्या पिरतीची' या गीतकाव्याने प्रीतीचे पाऊस ओले रंग उधळले.

दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमांची दखल शासकीय पातळीवर घेतली जात असून या ‘स्वच्छंद काव्य संगीत संध्या'चे प्रसारण मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन ७ जुलै २०२३ रोजी रात्री ८ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली. जे रसिक नागरिक कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी दूरदर्शनवरुन ७ जुलै रोजी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

नवी मुंबई महापालिका स्वच्छतेच्या दृष्टीने करीत असलेल्या प्रयत्नांना महाराष्ट्रातील नामवंत कवी आणि संगीतकार यांनी स्वयंस्फूर्तीने केलेला कार्यक्रम आमचा उत्साह वाढवणारा आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण'च्या अनुषंगाने नवी मुंबईत ठिकठिकाणी रेखाटलेल्या चित्रकविताभिंतींमुळे तसेच मागील वर्षी राष्ट्रीय पातळीवर नोंद घेतल्या गेलेल्या ‘स्वच्छ कवी संमेलन'मुळे नवी मुंबईची ओळख ‘कवितांचे शहर' म्हणून होऊ लागली असल्याबद्दल आनंद वाटतो. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आपत्कालीन नियंत्रण कक्ष १ जून ते ३० सप्टेंबर पर्यंत 24 x 7 तत्त्वावर राहणार कार्यरत