अमृत २.० अभियान अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी

 ‘अमृत अभियान'च्या केंद्रीय पथकाची नवी मुंबईत पाहणी

नवी मुंबई ः केंद्र सरकारच्या गृहनिर्माण-शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने अमृत आणि अमृत २.० अभियान अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देऊन केंद्रीय अमृत अभियान पथकाने या प्रकल्पांची सविस्तर माहिती घेतली.

यावेळी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पथकाचे प्रमुख गृहनिर्माण-शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांचे उपसचिव हरिश्चंद्र प्रसाद, ‘अमृत अभियान पथक'च्या सदस्या सिध्दी मोहटा, ‘अर्नेस्ट अँड यंग'च्या प्रोजेक्ट मॉनिटरींग युनिटचे आयटी मॅनेजर परितोष धवन, ‘महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय'चे कार्यकारी संचालक मनोहर हिरे यांचे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने स्वागत केले. याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, अजय संखे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

अमृत आणि अमृत २.० या अभियान अंतर्गत नवी मुंबई महापालिकेने राबविलेल्या प्रकल्पांची यावेळी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली. त्या अनुषंगाने विविध मुद्द्यावर चर्चा करीत पथकातील सदस्यांनी या प्रकल्पांद्वारे नागरी सुविधांमधील वाढ तसेच पर्यावरण संरक्षण-संवर्धनासाठी या प्रकल्पांचा होणारा लाभ याविषयी अधिक माहिती जाणून घेतली.

अमृत अभियान अंतर्गत नवी मुंबई महापालिकेने कोपरखैरणे आणि ऐरोली येथील सी-टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मलप्रक्रिया केंद्रांमध्ये प्रत्येकी २० द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेचे टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्प उभारले असून त्यातून निर्माण होत असलेल्या पुर्नपक्रियाकृत पाण्याच्या वापराविषयीची विस्तृत माहिती पथकाने घेतली. तसेच अमृत २.० अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांच्या सद्यस्थितीचाही आढावा घेतला.

अमृत २.० अभियान अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या मानकांचा आढावा घेत ‘अमृत अभियान पथक'ने सद्यस्थितीत सुरु असलेल्या कामांची अंमलबजावणी करताना येत असलेल्या आव्हानांबाबत तसेच मालमत्ता कर आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याचाही आढावा घेतला. याशिवाय नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्तांच्या जीआयएस मॅपींगची सद्यस्थिती पथकाने जाणून घेतली. तसेच ज्या पाण्यापासून महसूल प्राप्त होत नाही असे नॉन रेव्हेन्यू वॉटर (ऱ्Rें) रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपायोजनांची माहिती जाणून घेत केलेल्या उपायोजनांबाबत समाधानही व्यक्त केले.

यावेळी पथकाने मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियाकृत सांडपाण्याच्या होत असलेल्या वापराचे प्रमाण जाणून घेतले. तसेच उद्योग समुहांना देण्यात येणाऱ्या या पुर्नप्रक्रियाकृत पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. भविष्यात सदर पाण्याचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात होण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी माहिती जाणून घेतली.

पाणी पुरवठा आणि मलनिःस्सारण सेवा अधिकाधिक प्रभावीपणे देण्याकरिता आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाबाबत नवी मुंबई महापालिका राबवित असलेल्या उपक्रमांचीही माहिती यावेळी घ्ोण्यात आली. त्याचप्रमाणे केंद्रीय पथकाने कोपरखैरणे येथील २० द.ल.लि. क्षमतेच्या टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्पाला भेट देऊन तेथील कार्यप्रणाली बारकाईने जाणून घेत समाधान व्यक्त केले.

सदर पथकाने प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करुन संवर्धन करण्यात आलेल्या कोपरखैरणे, सेक्टर-१४ येथील निसर्गोद्यानालाही भेट दिली. सदर ठिकाणी विकसित करण्यात आलेल्या मियावाकी स्वरुपाच्या शहरी जंगलाला भेट देत प्रभावी पर्यावरणशील उपक्रमाबाबत महापालिकेचे कौतुक केले.

एकंदरीतच नवी मुंबई महापालिकेने केंद्र शासनाच्या गृहनिर्माण-शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने सुरु असलेल्या अमृत आणि अमृत २.० अभियानामध्ये राबविलेल्या प्रकल्पांची चांगल्या रितीने पर्यावरणपूरक अंमलबजावणी केली असल्याबद्दल केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोकणातील प्रवाशांसाठी खुशखबर!