एपीएमसी फळ बाजारात आग लागलेल्या ठिकाणी पुन्हा तेच अवैध व्यवसाय?

आग लागलेल्या गाळ्यात आणि परिसरात आज ‘जैसे थे' परिस्थिती

वाशी ः नोव्हेंबर २०२२ मध्ये वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात कागदी पुठ्ठा आणि लाकडी पेट्या बनवणाऱ्या गाळ्यात आग लागल्याची घटना घडली होती.सदर आग येथील अतिक्रमणामुळे अधिक पसरल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला होता. मात्र, अग्निशमन दलाने अंदाज वर्तवून देखील आग लागलेल्या गाळ्यात आणि परिसरात आज ‘जैसे थे' परिस्थिती असून, पुन्हा या ठिकाणी अवैध व्यवसाय सुरु आहेत.त्यामुळे या आगीतून एपीएमसी प्रशासनाने कुठलाच बोध घेतला नसल्याचे चित्र दिसत आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून एपीएमसी मार्केट ओळखले जाते. त्यामुळे येथे रोज शेकडो गाड्या शेतमाल येतो. यात भाजी, फळे, कांदा-बटाटा आदींचा समावेश आहे. एपीएमसी बाजारात येणारी फळे किरकोळ बाजारात विक्री साठी बॉक्स, लाकडी पेट्यांची अधिक आवश्यकता लागते. त्यामुळे एपीएमसी बाजारात कागदी बॉक्स, लाकडी पेट्या, गवत इत्यादी अधिक प्रमाणात दाखल होत असतात. फळ बाजारात संरक्षण भिंतीलगत असलेल्या जागेत एपीएमसी प्रशासनाने खोके, पुठ्ठे ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे.  तसेच त्या ठिकाणी शेड देखील बांधण्यात आले आहेत. परंतु, काही व्यापारी दिलेल्या जागेपुरता वापर न करता अतिक्रमण करुन अतिरिक्त जागेचा वापर करीत असून, खोके, पुठ्ठ्यांचा पसारा सर्वत्र मांडत आहेत. त्यामुळे एपीएमसी बाजारात आगीच्या  घटना  घडत असतात. एपीएमसी बाजारातील अतिक्रमणामुळे आग विझवणयासाठी अग्निशमन दलाला अडचणी येत असतात.त्यामुळे नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाने एपीएमसी प्रशासनाला येथील परिस्थिती बाबत वारंवार सूचना दिल्या आहेत. मात्र, या सूचनांना एपीएमसी प्रशासनाने दुर्लक्ष करीत केराची टोपली दाखवून एपीएमसी बाजार आवारातील अतिक्रमणांना खतपाणी घालत येथील अग्नि सुरक्षा  वाऱ्यावर सोडली आहे. मात्र, १७ नोव्हेंबर २०२२ रोजी एपीएमसी फळ बाजारात लागलेल्या भीषण आगीमुळे एपीएमसी बाजार समितीतील अग्नि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. या आगीत येथील २० ते २५ गाळे आगीच्या भक्षस्थानी गेले. सदर आग येथील कागद पुठ्ठे, लाकडी खोके व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे अधिकच भडकल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात  आला होता. मात्र, आगीबाबत अंदाज वर्तवून देखील आग लागलेल्या गाळ्यात आणि परिसरात आज ‘जैसे थे'  परिस्थिती असून, पुन्हा या ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू आहेत.याबाबत ‘एपीएमसी बाजार समिती'चे कार्यकारी अभियंता सुरेश मोहाडे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

अतिक्रमण विरोधी अहवाल गेला कुणीकडे?

१७ नोव्हेंबर २०२२ रोजी एपीएमसी फळ बाजारात आग लागली. सदर आग अतिक्रमणामुळे अधिकच फोफावली होती. त्यानंतर एपीएमसी प्रशासनाने  पाच  बाजाराचे उपसचिव, कार्यकारी अभियंता आणि सुरक्षा अधिकारी यांची एक विशेष समिती गठीत केली होती.  या समितीने पाचही एपीएमसी बाजाराचा अतिक्रमण बाबत पाहणी दौरा करुन ८ दिवसात एपीएमसी प्रशासनाला अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली होती. पाहणी दौऱ्या दरम्यान एपीएमसी बाजारातील अनधिकृत बांधकाम, वाढीव जागेचा वापर तसेच पार्किंगचा प्रश्न यामुळे एपीएमसी परिसरात दाटीवाटी होत आहे, असे या समितीच्या निदर्शनास आले होते. मात्र, या घटनेला पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरी देखील सदर अहवाल प्रसिध्द करण्यात आला नाही. त्यामुळे सदर अहवाल हरवला का?, असा सवाल एपीएमसी बाजार आवार घटकांकडून उपस्थित केला जात आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

युलू ई-बाईक्सना तरुणांची पसंती