वाशीत बॉयलर इंडिया प्रदर्शनाला सुरुवात

उद्योगांना सर्व सुविधा, प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन तत्पर - ना.उदय सामंत

नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभाग अंतर्गत असलेल्या ‘बाष्पके संचालनालय'च्या वतीने आयोजित जागतिक स्तरावरील बॉयलर इंडिया-२०२२ प्रदर्शन, चर्चासत्र आणि कार्यशाळेचे उद्‌घाटन उद्योग मंत्री उदय सामंत आणि कामगार मंत्री तथा ‘परिषद'चे स्वागताध्यक्ष सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले.

वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्राच्या ठिकाणी तीन दिवस बॉयलर इंडिया प्रदर्शन, चर्चासत्र भरविण्यात आले आहे. याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश बालदी, आमदार रमेश पाटील, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, विभागीय आयुक्त तथा ‘रायगड'चे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, कामगार आयुक्त सुरेश जाधव, ‘बाष्पके संचालनालय'चे संचालक धवल अंतापूरकर, ‘अदानी पॉवर'चे थर्मल हेड चैतन्य प्रसाद साहू, ‘थायसन ग्रुप'चे व्यवस्थापकीय संचालक विवेक भाटिया, आदि उपस्थित होते.
सदर प्रदर्शनात जर्मनी, स्विझरलँड, इंग्लंड या देशासह दहा देशातील सुमारे २८० उद्योजकांनी सहभाग नोंदविला आहे. बाष्पके (बॉयलर) संबंधीत विविध यंत्रे, साहित्य यांची मांडणी येथे आहे. याशिवाय बाष्पके उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान, घडामोडी यांची माहिती होण्यासाठी चर्चासत्र आणि परिसंवादाचे आयोजन तीन दिवस चालणार आहे. परिसंवादात या क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी बॉयलर क्षेत्राशी संबंधित तीन पुस्तकांचे प्रकाशन ना. उदय सामंत आणि ना. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.


राज्यात उद्योगासाठी पुरक वातावरण असून उद्योगांना लागणाऱ्या सर्व सुविधा आणि प्रोत्साहनपर पॅकेज राज्य शासन देईल. बाष्पके (बॉयलर) क्षेत्रात होणारे बदल या क्षेत्रासंबंधीची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रदर्शन उपयुक्त आहे. कामगार आणि उद्योग विभाग एकत्र येऊन उद्योगांना चांगल्या सुविधा देऊ. सध्या असलेल्या आणि नवीन उद्योगांनाही इतर राज्यांपेक्षा वीज, जमीन आणि इतर प्रोत्साहनपर सुविधा महाराष्ट्र शासन देईल. राज्यात नवनवीन उद्योग येण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंरंेद्र मोदी यांच्याशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली आहे.

वेदांतापेक्षाही मोठा उद्योग राज्यात आणण्यात येईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील उद्योग क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे ना. उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. राज्यातील सर्व प्रकल्पांना इतर राज्यांपेक्षाही चांगल्या सुविधा देण्याचा राज्य शासन प्रयत्न करत आहे. बॉयलर उद्योग वाढीसाठीही राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल. राज्यात बॉयलर पार्क उभारण्यासाठी ‘एमआयडीसी'च्या माध्यमातून पूर्ण मदत देण्यात येईल. तसेच या
क्षेत्रासाठीही प्रोत्साहनपर पॅकेज देण्यासाठीही प्रयत्न करु, असेही ना. सामंत म्हणाले.

उद्योग क्षेत्रात राज्य अग्रेसर ठेवण्यासाठी कामगार विभाग योगदान देत असून उद्योगांना सर्वसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. उद्योग उभारण्यासाठी परवान्यांची सुलभता, कामगारांची सुरक्षितता आणि कामगार हित या त्रिसुत्रीची अमंलबजावणी राज्यात प्रभावीपणे सुरू आहे. उद्योग आणि कामगार विभाग एकत्र काम करत आहेत. बॉयलर सर्व उद्योगांचा महत्त्वाचा घटक आहे. या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होऊन पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीमध्ये हातभार लागेल, यासाठी बाष्पके निर्माते आणि वापरकर्त्यांनी
प्रयत्न करावेत, असे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.

व्यवसाय सुलभीकरण अंतर्गत (ईज ऑफ डुइंग बिझनेस) राज्यातील ३९२ सेवा ऑनलाईन झाल्या असून त्यापैकी ४१ सेवा या कामगार विभागाशी संबंधित आहेत. त्यातही बॉयलर विभागाच्या सव्रााधिक सेवा ऑनलाईन झाल्या आहेत. व्यवसाय सुलभीकरणामध्ये कामगार विभागाने मूलभूत आणि महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्याअंतर्गत एक खिडकी योजना राबवून एकाच अर्जावर सर्व परवाने देण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असेही ना. खाडे यावेळी सांगितले. यावेळी ना. उदय सामंत, ना. सुरेश खाडे यांनी प्रदर्शनस्थळातील विविध स्टॉलना भेटी देऊन माहिती घ्ोतली. प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांनी प्रदर्शन आणि चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. ‘बाष्पके संचालनालय'चे संचालक ध. प्र. अंतापूरकर यांनी प्रास्ताविकात बाष्पके संचालनालय आणि चर्चासत्राविषयी माहिती दिली. यावेळी उद्योग प्रतिनिधींनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान, उद्‌घाटन कार्यक्रमानंतर बाष्पके उद्योगाशी संबंधित विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी रुग्णालयात ‘क्ष किरण फिल्म'चा पुरवठा तत्काळ करावा, अशी मागणी