‘माझी वसुंधरा अभियान'मध्ये क-वर्ग महापालिकांमध्ये नवी मुंबई राज्यात प्रथम

शहराचा बहुमान पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या सातत्यपूर्ण कामाचा परिणाम -आयुवत नार्वेकर

नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण-वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ३.० सन २०२२-२३'मध्ये क-वर्ग महापालिकांमध्ये नवी मुंबई महापालिका राज्यात सर्वप्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. पुरस्काराची ७ कोटी रुपये रक्कम नवी मुंबई महापालिकेला प्रदान करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यातील मोठ्या शहरांच्या अ, ब, क वर्ग एकूण महापालिकांमधून नवी मुंबईला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते, मुंबई येथील एनसीपीएमध्ये झालेल्या विशेष समारंभात विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सदर मानाचा पुरस्कार स्विकारला.

याप्रसंगी आयुक्त नार्वेकर यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे पुरस्कार स्विकारताना उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिकेने पर्यावरणशील शहर निर्मितीकरिता प्रभावी घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना, हरित क्षेत्रामध्ये वाढ तसेच प्लास्टिक प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर अशी पर्यावरणपूरक उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून अनेक नाविन्यपूर्ण उपाययोजना राबविल्या आहेत. तसेच वृक्षारोपणाप्रमाणेच वृक्षसंवर्धनाकडेही विशेष लक्ष देत मागील २ वर्षात दोन लाखांहून अधिक वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली आहे. शहरी भागांमध्ये वृक्ष तसेच हिरवळ संवर्धनासाठी जाणवणारी जागेची कमतरता लक्षात घेऊन महापालिकेने कमी जागेत दाट जंगल निर्माण करणाऱ्या मियावाकी पध्दतीच्या शहरी जंगल निर्मितीला प्राधान्य दिले. यामध्ये जैवविविधता वाढविण्यासाठी पशुपक्षांचा अधिवास वाढविणाऱ्या देशी प्रजातींच्या वृक्ष लागवडीवर आणि त्यांच्या संवर्धनावर भर देण्यात आला. कोपरखैरणे, सेक्टर-१४ येथील निसर्गोद्यानामध्ये मियावाकी पध्दतीने ६२ हजार झाडे लावण्यात आली. त्याचप्रमाणे नेरुळ, सेक्टर-२८ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथेही मियावाकी पध्दतीने १ लक्ष २३ हजार देशी प्रजातीच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली आहे. एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आलेला ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील प्रकल्प देशातील सर्वात मोठा मियावाकी पध्दतीचा शहरी जंगल प्रकल्प आहे. यामुळे शहराच्या हरित क्षेत्रात लक्षणीय वाढ झालेली आहे.

नवी मुंबई शहराच्या १०९.५९ चौ. कि. मी क्षेत्रफळात ३९ टक्के हरित क्षेत्र निर्माण झाले असून २२५ बागा, उद्याने, पार्क, हरित क्षेत्रे यामुळे नवी मुंबई उद्यानांचे शहर म्हणून नावाजले जाते. इतक्या मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र निर्मितीमुळे नागरिकांना आरोग्यदायी आणि नजरेला सुखावणारे हिरवाईचे वातावरण उपलब्ध झाले आहे.

शहरातील वायू प्रदुषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवितानाच महापालिकेने सुरु केलेली युलू ई-बाईक्स  संकल्पना वायू प्रदुषण कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरली आहे. यापूर्वीची युलू सायकल संकल्पना देखील लोकप्रिय ठरली होती. युलू ई-बाईक द्वारे ५ महिन्यात ४००९० ग्रॅम कार्बन उत्सर्जनाची बचत झाली आहे. यामध्ये आतापर्यंत ३५ कोटी ग्रॅम्सपेक्षा अधिक कार्बन फुटप्रिटंची बचत झालेली असून सार्वजनिक सायकल सेवेचा मोठ्या प्रमाणावर वापर करणारे नवी मुंबई देशातील अग्रगण्य शहर आहे. शहरात १५ कि.मी. सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे युलू ई-बाईक तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली असून वाहतुकीच्या पर्यावरणशील पर्यायांचा उपयोग केला पाहिजे, असा विचार भावी पिढीच्या मनात रुजविण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरलेली आहे.

वायू प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने फेम २ अंतर्गत २० ठिकाणी इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन्स आणि त्यामध्ये १२० चार्जिंग पॉईंटस्‌ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नवी मुंबईची प्रवासी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी ‘एनएमएमटी'ने पर्यावरणशील भूमिका जपत इलेक्ट्रीक मोबॅलिटीमध्ये पुढाकार घेतला आहे. सद्यस्थितीत १८० इलेक्ट्रिकल बसेसद्वारे विश्वासार्ह प्रवासी सेवा पुरविली जात असून मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना कार्बन उत्सर्जन कमी करणारी पर्यावरणशील प्रवासी सेवा पुरविली जात आहे.

अशाच प्रकारे स्थानिक पातळीवर विभागाविभागांमध्ये स्वयंसेवी संस्थांमार्फत कचरा वर्गीकरण, एकल प्लास्टिकच्या वापराला प्रतिबंध असे विविध प्रकारचे जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असून वृक्षारोपण, स्वच्छता विषयक मोहिमाही मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहेत. यासह अनेक उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनासाठी सामुहिक जबाबदारीची भावना वाढीस लागली आहे.

विविध प्रकारच्या कचऱ्यांमध्ये माशांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने फिशफेड अत्यंत वेगळा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास दिवाळे येथील मार्केट पासून सुरुवात केली असून त्याची विशेष नोंद केंद्र आणि राज्य स्तरावर घेण्यात आलेली आहे. दररोज १ टन मासळी बाजारातील कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. याद्वारे स्वयंसहाय्यता गटांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झालेल्या आहेत.

ऐरोली आणि कोपरखैरणे येथील अत्याधुनिक मलप्रक्रिया प्रकल्पातील प्रक्रियाकृत ४० द.ल.लि. पाण्यावर टर्शिअरी ट्रिटमेट करून त्यामधील ६ द.ल.लि. टर्शिअरी प्रक्रियाकृत पाणी एमआयडीसी क्षेत्रातील १४ उद्योगांना पुरविण्यास सुरुवात झालेली आहे. तशा प्रकारचा करार एमआयडीसी सोबत झालेला आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये याकरिता नागरिकांमध्ये विविध माध्यमांतून जनजागृती केली जात असून प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमाही प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जात आहे.

‘थ्री आर' अर्थात कचऱ्याचा पुनर्वापर (Rाल्ेा), कचरा निर्मितीत घट (Rा्‌ल्म) आणि कचऱ्यावर पुर्नप्रक्रिया (Rाम्ब्म्त) या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात असून शहरात नको असेल ते द्या आणि हवे असेल ते घ्या या संकल्पनेवर आधारित माणुसकीचे देणे-घ्ोणे अशी ९२  थ्री आर सेंटर्स शहरात ठिकठिकाणी उभारली गेली आहेत. या सेंटर्सना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पर्यावरणाविषयी नागरिकांमध्ये सजगता यावी आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आयोजित उपक्रमांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग रहावा यादृष्टीने पथनाट्यासारख्या प्रभावी माध्यमाचा वापर केला जात आहे. त्यासोबतच स्वच्छता मोहिमा, प्लास्टिक प्रतिबंध मोहिमा, विविध स्पर्धांचे आयोजन, माझी वसुंधरा सामुहिक शपथ ग्रहण, चित्रभिंती आणि शिल्पाकृतींद्वारे शहर सौदर्यीकरणावर भर असे विविध माहिती, शिक्षण आणि संवाद उपक्रम राबविले जात आहेत.

‘माझी वसुंधरा अभियान'मध्ये नवी मुंबई महापालिकेला राज्यातील क-वर्ग महापालिकांमध्ये राज्यात लाभलेला प्रथम क्रमांकाच्या शहराचा बहुमान पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांच्या सातत्यपूर्ण कामाचा परिणाम आहे. सदर पुरस्कार नागरिकांनाच समर्पित असल्याची भावना व्यक्त करीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई स्वच्छतेप्रमाणेच निसर्गातील भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांच्या संवर्धनासाठी जागरुकतेने काम करीत असल्याचे म्हटले आहे.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सदर पुरस्कार पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहभागाला समर्पित करीत आहे. पर्यावरण विषयक विविध उपक्रमांमध्ये मनापासून सहभागी होणारे लोकप्रतिनिधी, विविध स्वयंसेवी संस्था आणि मंडळे यांचे सदस्य, पर्यावरणप्रेम जपणारे नागरिक तसेच अधिकारी आणि त्यातही विशेषत्वाने स्वच्छता, उद्यान आणि विविध विभागांतील कर्मचारी त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमे या साऱ्याच्या एकत्रित कार्याचा सन्मान आहे. या यशाबद्दल समस्त नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन आणि मौलिक सहकार्याबद्दल आभार मानतो. - राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघरमधील  ‘अश्वमेध यज्ञ' साठी भूमीपुजन संपन्न