हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशावर किरकोळ कारणावरुन चौघा मारेक-यांचा जिवघेणा हल्ला
पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्त्यांना प्रतिसाद वाढला
नवी मुंबई-: गणेशोत्सवाच्या निमित्ताने आतापासून बाजरात विविध रूपातील आकर्षक अशा गणेश मूर्ती दाखल झाल्या आहेत. दरवर्षी पीओपीच्या गणेश मू्र्ती खरेदीकडे नागरिकांचा कल असतो. पण आता पर्यावरणाच्या बाबतीत होत असलेली जनजागृती व शासनामार्फत करण्यात येणाऱ्या आवाहनाला प्रतिसाद देत जास्तीत जास्त ग्राहकांनी पर्यावरण पूरक गणेश श्री मूर्तींना आपली जास्त पसंती दर्शवली आहे. त्यामुळे मूर्ती विक्रेत्यांनी देखील यंदा पीओपी मुर्तींपेक्षा शाडू आणि कागदापासून बनविलेल्या मुर्त्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध केल्या आहेत.
मागील दोन वर्षे कोवीड मुळे शासनाने सार्वजनिक सणांवर निर्बंध घालत सर्व सण साधेपणाने साजरे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यात गणेशोत्सव सणाचा देखील समावेश होता. ३१ ऑगस्ट पासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने शहरातील अनेक ठिकाणी गणेश मूर्ती विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे मागील दोन वर्षे घरातच विसर्जित होणाऱ्या, लहान व पर्यावरण पूरक अशा श्री मूर्ती खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढत चालला आहे. यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे शाडू मातीच्या आणि कागदी लगद्यापासून बनविललेल्या गणेश मूर्ती खरेदीकडे भक्तांची पसंती असते. त्यामुळे मूर्ती विक्रेत्यांकडे मागील वर्षीच्या तुलनेत जास्त इकोफ्रेंडली मुर्त्या उपलब्ध आहेत. यंदा ७० टक्क्यांहून अधिक शाडू मातीच्या व कागदापासून बनविलेल्या गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पीओपीच्या मूर्ती खरेदी करू नका, याबाबत दरवर्षी शासनामार्फत प्रबोधन करण्यात येते. यानुसार यंदा पीओपींच्या मूर्तीच्या तुलनेत शाडू मातीच्या आणि कागदापासून बनविलेल्या सर्वाधिक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यावरण पूरक आणि आकर्षक मूर्तींची बुकिंग करण्याकडे आतापासूनच कल वाढला आहे.