श्रीगणेशोत्सव व्यवस्थेची महापालिका आयुक्तांकडून पाहणी

आयुक्त बांगर यांची कृत्रिम तलाव, नैसर्गिक विसर्जन तलाव स्थळी प्रत्यक्ष पाहणी

नवी मुंबई ः कोरोना प्रभावित कालावधीनंतर २ वर्षानंतर निर्बंधामध्ये शिथिलता आलेली असताना, ३१ ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने असून नवी मुंबई महापालिकेची संपूर्ण यंत्रणा उत्सव व्यवस्थित पध्दतीने साजरा व्हावा याकरिता दक्षतेने कार्यरत आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करुन भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना दिले.


नवी मुंबई महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यादृष्टीने शाडूच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करावी तसेच  नैसर्गिक जलाशयांचे प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. याकरिता बेलापूर ते दिघा अशा आठ विभाग कार्यालय क्षेत्रात १३४ इतक्या मोठ्या संख्येने कृत्रिम विसर्जन तलाव बनविण्यात आले असून त्यापैकी काही कृत्रिम तलावांची तसेच नैसर्गिक विसर्जन तलावांची पाहणी आयुक्तांनी केली.


कृत्रिम आणि नैसर्गिक विसर्जन तलावांच्या ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा सज्ज ठेवाव्यात असे सूचित करतानाच आयुक्तांनी पारंपारिक नैसर्गिक २२ विसर्जन तलावांजवळ जागा असेल त्या ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव उभारुन नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व लक्षात आणून द्यावे. यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयाने आपापल्या क्षेत्रातील पर्यावरणविषयक स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन त्यांचे स्वयंसेवक आणि महापालिका कर्मचारी विसर्जनाच्या दिवशी विसर्जनस्थळी उपस्थित राहून विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना कृत्रिम तलावात विसर्जन करावे अशी विनंती करतील अशा प्रकारे व्यवस्था करण्याचे सूचित केले.


नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व तलावांच्या जलाशयातील पालापाचोळ्याची नियमित सफाई केली जाते, ती गणेशोत्सव कालावधीत अधिक काटेकोरपणे करण्यात यावी. श्रीमूर्तींसोबत येणारे हार, फुले असे ओले निर्माल्य तसेच कंठी, मुकुट, कृत्रिम माळा, सजावट साहित्य असे सुके निर्माल्य विसर्जनस्थळी ठेवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या निर्माल्य कलशात टाकले जाईल, याकडेही लक्ष ठेवण्यात यावे. विसर्जन स्थळांवर एकाचवेळी जास्त गर्दी होऊ नये याचे पोलीस विभागाशी समन्वय साधून पूर्वनियोजन करावे. त्याचप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते अशा नैसर्गिक विसर्जन स्थळी सीसीटीव्ही यंत्रणा नियमित सुरु राहील याकडेही विशेष लक्ष देण्यात यावे. सर्व विसर्जन स्थळांवर स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यासह सुरक्षा रक्षक, अग्निशमन जवान, आरोग्य यंत्रणा यांनाही परस्पर समन्वय राखून संबंधित विभाग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली दक्षतेने काम करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी दिले.


या विसर्जनस्थळे पाहणी प्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, उपआयुवत दादासाहेब चाबुकस्वार, अतिरिक्त शहर अभियंता  मनोज पाटील, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, सुनिल लाड, आदि उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने श्रीगणेशोत्सव निर्विघ्नंपणे संपन्न् व्हावा यादृष्टीने आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात आली आहे. पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.   - अभिजीत बांगर, आयुक्त - नवी मुंबई महापालिका. 

 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 करावे गांवच्या विकासाचे रेखाचित्र प्रत्यक्षात उतरणार