सर्वांच्या एकात्म सहभागातून प्रत्येक घरावर तिरंगा फडणार

नवी मुंबईतील एकात्म संस्कृतीचे दर्शन घडविण्याचे आवाहन

नवी मुंबई ः आपल्या भारतीयांमध्ये देशभक्ती उपजतच असून देशप्रेमाची उज्वल परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण देशभरात देशभक्तीची एक उत्साही लाट उसळलेली दिसत आहे. यामध्ये महापालिकेच्या वतीनेही विविध स्तरांवर अभिनव उपक्रम राबविले जात असून त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद लाभताना दिसत आहे. प्रत्येक महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जे जे नाविन्यपूर्ण करावेसे वाटेल ते ते ध्वज संहितेचे पालन करून करावे. या कामांमध्ये लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, नागरिक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग करुन घ्यावा आणि नवी मुंबईतील एकात्म संस्कृतीचे दर्शन घडवावे, अशा सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या.
नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील ॲम्पिथिएटरमध्ये आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधत त्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजन करावयाचा स्वराज्य महोत्सव तसेच घरोघरी तिरंगा उपक्रम याविषयी मार्गदर्शन केले.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विविध पातळ्यांवर आयोजित केल्या जात असलेल्या मोठ्या प्रमाणावरील कार्यक्रमांमुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील १९४२ च्या चळवळीसारखे देशभक्तीने भारलेले वातावरण सगळीकडे दिसत असल्याचे अधोरेखित करीत आयुक्तांनी घरोघरी तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिकेप्रमाणेच स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी, विविध संस्था, मंडळे, नागरिक मोठ्या उत्साहाने पुढाकार घ्ोऊन काम करीत असल्याचे विशेषत्वाने नमूद केले. एकात्मतेची भावना हीच आपल्या नवी मुंबईची आणि देशाची ओळख असून स्थानिक पातळीवर काम करताना सर्वांना सोबत घ्ोऊन सदर उपक्रम यशस्वी करावा, असे आयुक्तांनी अधिकारी, कर्मचारी यांना सूचित केले.
घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील १०० टक्के घरांवर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा फडकला पाहिजे असे आपले उद्दिष्ट असून त्यादृष्टीने सर्वांची मदत घेऊन प्रत्येक घरापर्यंत पोहचण्याचे नियोजन करा. प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरावर फडकविण्यासाठी स्वयंस्फुर्तीने झेंडा खरेदी करणे अपेक्षित असून ज्यांना खरेदी करणे शक्य नाही अशा अल्प उत्पन्न गटाच्या भागात महापालिकेच्या वतीने झेंडे वितरित करण्यात येत आहेत. झेंडे संग्रहित आणि वितरित करताना झेंड्याचा ध्वजसंहितेनुसार यथोचित सन्मान राखला जाईल याची काटेकोर दक्षता सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी घ्यावी. १५ ऑगस्ट नंतर नागरिकांनी आपला झेंडा घरात सन्मानपूर्वक सुरक्षितपणे जतन करुन ठेवावा असा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यात यावा. याबाबत महापालिकेच्या वतीने माहितीपत्रकही प्रसिध्द करण्यात आले असून त्याचेही वितरण झेंड्यासोबत तसेच सोशल माध्यमांवरुन व्यापक स्वरूपात करावे, असेही यावेळी आयुवत बांगर यांनी सूचित केले.


घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत नागरिक स्वतः ध्वज खरेदी करु शकतात. तसेच एकमेकांना भेटही देऊ शकतात. त्याचप्रमाणे विविध उद्योग, संस्था त्यांच्या सीएसआर निधीतून तसेच व्यक्ती त्यांच्यामार्फत नागरिकांना ध्वज उपलब्ध करुन देऊ शकतात. भारतीय राष्ट्रध्वजाविषयी आपला आदर आणि प्रेम प्रकट करण्यासाठी नागरिक राष्ट्रध्वजासोबत सेल्फी काढून महापालिकेच्या  @NMMConline  या फेसबुक पेजला आपला फोटो टॅग करुन व्यापक प्रसिध्दी मिळवू शकतात. तसेच समाज माध्यमांवरुन डिजीटल राष्ट्रध्वज एकमेकांना भेट देऊ शकतात. आपल्या पोषाखावर मेटल ध्वज परिधान करुन देशप्रेम व्यक्त केले जाऊ शकते. अशा विविध पर्यायांचा उपयोग करून नागरिकांनी देशाभिमान प्रकट करावा, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले.


यावेळी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे आयुक्तांसमवेत सामुहिक वाचन करण्यात आले. तसेच आयुक्त बांगर यांना तिरंगा झेंड्याची आकर्षक फ्रेम अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी वंदे मातरम्‌च्या जयघोषात आयुक्तांसमवेत सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे तिरंगा हातात धरुन समुह छायाचित्र काढण्यात आले. 

 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी कटिबद्ध आहोत- आ गणेश नाईक