कांदा बटाटा बाजारातील खड्ड्यांमुळे वाहन चालक बेजार
नवी मुंबई -; वाशीतील कांदा बटाटा बाजार आवारात रस्त्यातील दुभाजक काढल्याने त्याजागी तात्पुरती केलेली मलम पट्टी उखडल्याने त्याजागी आता मोठे खड्डे पडले आहेत.आणि खड्ड्यातून वाहन चालकांना वाहने हाकावी लागत असल्याने वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे चालक बेजार झाले आहेत.
वाशीतील कांदा बटाटा बाजार आवारातील रस्त्यात एपीएमसी प्रशासनाद्वारे कोविड काळात २०२० मध्ये अंदाजे साडेचार लाख खर्च करून दुभाजक तयार केले होते. मात्र सदर दुभाजकामुळे येथील रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे अवजड वाहनांना वाट काढताना मोठी कसरत करावी लागत होती. याच दरम्यान एका व्यापाऱ्याला वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने हा दुभाजक काढण्यात आला. त्यासाठी अंदाजे अडीच लाख खर्च करण्यात आला. मात्र सदर दुभाजक काढल्यानंतर या जागी पेव्हर ब्लॉक ने मलम पट्टी केली होती. मात्र ही मलम पट्टी आता उखडली असून त्याजागी आता मोठ मोठे खड्डे पडत चालले आहेत. त्यामुळे या खड्ड्यातून वाहन हाकताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असून वाहनांचे नुकसान देखील होत आहे.त्यामुळे सदर रस्त्यात दुभाजक.बनवताना वाहतूक नियमांचे पालन न करता सदर पदपथ प्रशासनाने बनविला होता का? असा सवाल करत सदर खड्डे तात्काळ भरण्यात यावे अशी मागणी येथील व्यापाऱ्यांनी केली आहे.