११ जुलै पर्यत मागण्या मान्य न झाल्यास १२ जुलैला शेतकऱ्यांचा गेट बंद आंदोलनाचा इशारा
उरण : शेतकऱ्यांच्या नोकर भरती आणि विविध मागण्यांसाठी कळंबूसरे येथील इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा ली या कंपनीच्या गेट समोर बहुजन मुक्ती पार्टी च्या मार्गदर्शनाखाली गेट आंदोलन करण्यात आले होते.या आंदोलनानंतर कंपनी प्रशासना सोबत झालेल्या चर्चे नंतर कंपनी प्रशासनाला ११ जुलै पर्यत मागण्या मान्य न झाल्यास १२ जुलै गेट बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
कळंबूसरे येथील शेतकऱ्यांनी नोकरी मिळेल या भावनेने आपल्या पिकत्या जमिनी इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा ली या कंपनीला दिल्या. त्यानंतर कंपनीने २०१४ ते २०१६ पर्यंत जागा संपादित करून २०१७ साली कंपनी स्थापन करण्यात आली. यावेळी कंपनी प्रशासनाने शेतकर्यांना लेखी स्वरूपात नोकरीचे हमी पत्र देण्यात आले होते. त्यामध्ये तीन वर्षांच्या पर्यंत नोकरी देण्यात येईल; तीन वर्षांमध्ये नोकरी दिली नाहीतर तीन वर्षानंतर दरमहा पगार सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र कंपनी सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना दिलेल्या १०५ हमी पत्रामधून आजतागायत ३५ शेतकऱ्यांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना नोकरी देण्यात आली नाही.
त्यामुळे आपल्या कळंबूसरे येथील शेतकऱ्यांनी आपल्या १) ज्या शेतकऱ्यांना काम दिले नाही त्यांचे शंभर टक्के भरती करून काम देण्यात यावे. २) हाऊस किपिंग या पदावर बेकायदेशीर झालेली भरती रद्द करण्यात यावी ३) पुढील होणारी भरती ही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच करावी ४)१०० टक्के भरती न केल्यास उर्वरित शेतकऱ्यांना दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता करून पगार सुरु करण्यात यावे. या विविध मागण्यांसाठी गुरुवारी ( दि२३) गेट आंदोलन कामगार नेते संतोष घरत यांच्या नेतृत्वाखाली उभारले.
गेट आंदोलनाची दखल कंपनीने घेऊन कामगार आणि कामगार प्रतिनिधीच्यात चर्चा केली आणि जुलैला बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र ११ जुलैला जर बैठक घेऊन मागण्या मान्य न झाल्यास, १२ जुलैला गेट बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने बहुजन मुक्ती पार्टी चे महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष घरत आणि शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी दिला आहे. यावेळी माजी सरपंच सुशील राऊत, शेतकरी उपस्थित होते.