नागरी आरोग्य केंद्र, शाळा इमारत बांधणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई

कंत्राटदाराला काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये? याबद्दल खुलासा सादर करण्याचे निर्देश


नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सुरु असलेली सुविधा कामे गुणवत्तापूर्ण रितीने पूर्ण करण्याप्रमाणेच ती विहीत वेळेत व्हावीत याकडे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे बारकाईने लक्ष असून तशा प्रकारचे निर्देश अभियांत्रिकी विभागाला यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. तरीही कोपरखैरणे विभागातील विविध कामांची ३ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष पाहणी करताना त्यामध्ये सेक्टर-१४ आणि सेक्टर-१६ येथील नागरी आरोग्य केंद्राचे बांधकाम तसेच श्रमिक नगर येथील शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम फारशा गतीने सुरु नसल्याची बाब आयुक्त बांगर यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे सदर कामांची आयुवतांनी सविस्तर माहिती जाणून घेतली असता या कामांना मोठ्या प्रमाणात दिरंगाई झाली असल्याचे आढळले. तसेच संबंधित कंत्राटदाराला वारंवार संधी देऊनही त्या कामात सुधारणा करण्यात आली नसल्याचेही दिसून आले.  


विशेष म्हणजे सदर तिन्ही कामे आरोग्य आणि शिक्षण यादृष्टीने अत्यंत महत्वाच्या सुविधांची असल्याने त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून देखील तसेच याबाबत वारंवार तोंडी आणि लेखी सूचना देऊनही कामात सुधारणा न झाल्याने  कंत्राटदार मे. ए.ई. इन्फ्रा. प्रा. लि. यांना निविदेतील अटी-शर्ती नुसार त्यांच्याकडून काम काढून घेऊन कंत्राट रद्द करण्याचे आदेश बजावण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये? याबाबत खुलासा सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
कोपरखैरणे, सेक्टर-१४ येथील भूखंड क्रमांक-२२ यावर बांधण्यात येणाऱ्य नागरी आरोग्य केंद्राकरिता तसेच कोपरखैरणे, सेक्टर-१६ येथील भूखंड क्रमांक-३८ वर बांधण्यात येत असलेल्या नागरी आरोग्य केंद्रासाठी ६ मार्च २०१९ ते ५ मार्च २०२० या कालावधीसाठी कार्यादेश देण्यात आलेले होते. परंतु, सदर कंत्राटदाराने नमूद कालावधीमध्ये काम पूर्ण न केल्याने ७.५ टक्के दंडात्मक शुल्क आकारुन त्याला काम पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती.त्यानंतरही वाढीव मुदतीत काम पूर्ण न झाल्याने कंत्राटदाराला वारंवार लेखी कळविण्यात आले होते. तसेच कामाची प्रगती समाधानकारक नसल्याने अनेकदा आढावा बैठका घेऊन तसेच तोंडी सूचना देऊन नागरी आरोग्य केंद्र इमारतीच्या बांधकामाचे महत्व निदर्शनास आणून देण्यात आले होते.


सदर दोन्ही नागरी आरोग्य केंद्रांच्या सेक्टर-१४ आणि सेक्टर-१६ परिसरात अल्प उत्पन्न धारक नागरिक मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांना आवश्यक आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने या इमारती विहीत वेळेत पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु, वारंवार सूचना देऊनही अद्यापपर्यंत सेक्टर-१४ येथील इमारतीचे ८५ टक्के तर सेक्टर-१६ येथील इमारतीचे ७० टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे संबंधित कंत्राटदाराला १७ जून २०२२ रोजी या दोन्ही कामांकरिता स्वतंत्ररित्या अंतिम नोटीस देण्यात आलेली होती. पण, त्यानंतरही कामात सुधारणा न झाल्याने आणि याविषयी कंत्राटदाराने स्वारस्य न दाखवल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्याकडून सदरची दोन्ही कामे काढून घ्ोऊन समाप्त करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.


त्याचप्रमाणे श्रमिक नगर भागामध्ये भूखंड क्र. ओएस-२/२ (ए) आणि २/३ (ए) येथे शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी २१ फेब्रुवारी २०१९ ते २० फेब्रुवारी २०२० या कालावधीकरिता कार्यादेश देण्यात आले होते. परंतु, नमूद  कालावधीत सदरचे काम पूर्ण न झाल्याने ७.५ टक्के दंडात्मक शुल्क आकारुन येथील कंत्राटदारालाही ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. त्यानंतरही कामाची प्रगती समाधानकारक आढळून येत नसल्याने वारंवार आढावा बैठका घेऊन, तोंडी आणि लेखी सूचना देऊन कामाचे महत्व लक्षात घेऊन ते विहित वेळेत पूर्ण करावे, असे संबंधित कंत्राटदाराला आदेश देण्यात आले होते. वास्तविक पाहता श्रमिक नगर पूर्णपणे झोपडपट्टी भाग असून येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने सदर शाळा इमारत लवकरात लवकर उपलब्ध होणे आवश्यक होते. त्यामुळे वारंवार सूचित करुन देखील शाळा इमारतीचे ७० टक्केच काम पूर्ण झाल्याने १७ जून २०२२ रोजी संबंधित कंत्राटदाराला १५ दिवसांची अंतिम नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्याने या विषयी गांभीर्य न दाखवल्याने आणि कामाच्या पुढील नियोजनाबाबत कोणत्याही प्रकारे खुलासा सादर न केल्याने सदरचे काम कंत्राटदाराकडून काढून घेऊन ते समाप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


नवी मुंबई महापालिका नागरिकांना पुरवित असलेल्या सेवा-सुविधा उत्तम दर्जाच्या असण्यासोबतच त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याकडेही अभियांत्रिकी विभागाने काटेकोर लक्ष देणे अभिप्रेत आहे. याविषयी गांभीर्य न राखता दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचे तसेच अशा प्रकारे कामात निष्काळजीपणा दाखविणाऱ्या कंत्राटदारांना अभियांत्रिकी विभागाने काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकून त्यांना यापुढील काळात नवी मुंबई महापालिकेच्या कामांसाठी अपात्र ठरवावे.
-अभिजीत बांगर, आयुवत - नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राष्ट्रभक्तीपर गीते गाऊन तिरंगा घेऊन बोधपर पत्रकांची वाशीत प्रभात फेरी