कामोठे मध्ये ‘आमदार आपल्या दारी' उपक्रम

पनवेल : कामोठे वसाहत मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार ‘आमदार आपल्या दारी' उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमात कामोठे परिसरातील नागरिकांच्या सर्व समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.

पनवेल महापालिका आणि शासनाशी संबंधित असलेल्या विविध समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी' उपक्रम राबविण्यात येत आहे त्यानुसार कामोठे परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयामध्ये ‘आमदार आपल्या दारी' उपक्रम पार पडला. यावेळी नागरिकांनी सुरक्षा, आयुष्यमान क्लिनिक, पाणीटंचाई, प्रदूषण, ग्राउंड ,भाजी मार्केट, गार्डन, विरंगुळा केंद्र , स्पीडब्रेकर, पाणीपुरवठा, अग्निशामक दल, पेट्रोल पंप, मालमत्ता कर संदर्भात शास्ती माफी, लाईट, रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत गॅरेज, टॉयलेट, विरंगुळा केंद्र, वाचनालय, स्मशानभूमी, जिमखाना, मंदिरे अधिकृत करण्यासंदर्भातला विषय, पार्किंग यांसह विविध विषय नागरिकांनी मांडले.

नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत लवकरात लवकर कोमोठे मधील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असून, प्रत्येक तीन महिन्यानंतर नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये एका शहरात ‘आमदार आपल्या दारी' उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात समस्या मांडलेल्या, तक्रारी, सूचना केलेल्या नागरिकांना दहा ते पंधरा दिवसांमध्ये लेखी उत्तर दिले जाणार आहे, असे यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केले.

कोमोठे वसाहतीमधील नागरिकांच्या समस्या आणि सूचनांचा विचार करुन त्यांना योग्य ते सहकार्य करण्यात येईल तसेच नागरिकांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक केली जाईल, अशी ग्वाहीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली.

२ फेब्रुवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमाला कामोठे शहर भाजपाध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, कुसुम म्हात्रे, हेमलता गोवारी, ‘भाजपा महिला मोर्चा'च्या कामोठे शहराध्यक्ष वनिता पाटील, हॅप्पी सिंग, प्रदीप भगत, भाऊ भगत, राजेश गायकर, हर्षवर्धन पाटील,  विद्याताई तामखेडे, तेजस जाधव, दामोदर चव्हाण यांच्यासह कामोठे मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

९ फेब्रुवारी रोजी युवा सेना तर्फे राज्यभरात ‘कॉमन मॅन दिन' कार्यक्रम