जंगल सत्याग्रहाच्या ९२ व्या हुतात्मा स्मृती दिन हुतात्मा स्मृती स्तंभा समोर दरवर्षी उरण पोलीसांकडून हुतात्म्यांना मानवंदना
उरण : ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढल्या गेलेल्या गौरव व शौर्य शाली चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन चिरनेर ग्रामपंचायत,उरण पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि २५ सप्टेंबर २०२२रोजी करण्यात आले आहे. चिरनेर हुतात्मा स्मृती स्तंभा समोर साजरा करण्यात येत असलेल्या ९२ व्या हुतात्मा स्मृती दिन कार्यक्रमासाठी शिवसेनेचे युवा नेते तथा राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत.
स्वातंत्र्य संग्रामातील २५ सप्टेंबर १९३० साली झालेला चिरनेर जंगल सत्याग्रहातील आंदोलकांवर जुलमी ब्रिटिश सरकारने बेछूट गोळीबार केला होता.या गोळीबारात धाकू बारक्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी (चिरनेर), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), रामा बामा कोळी (मोठी जुई), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसूराम बुधाजी घरत (खोपटा), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या आठ सत्याग्रहींनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. तसेच यामध्ये ३८ आंदोलक जखमी झाले होते. चिरनेर जंगल सत्याग्रहात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे सदैव स्मरण रहावे आणि त्यांचा इतिहास भावी पिढीला ज्ञात व्हावा या हेतूने शासना तर्फे हुतात्मा स्मृती स्तंभा समोर दरवर्षी उरण पोलीसांकडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात येते.
यावर्षी चिरनेर ग्रामपंचायत उरण पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषद चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९२ वा हुतात्मा स्मृती दिन कार्यक्रम साजरा करत आहे. रविवार दि२५ सप्टेंबर २०२२ रोजी साजरा करण्यात येत असलेल्या हुतात्मा स्मृती दिन कार्यक्रमासाठी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार राजन विचारे, केंद्रिय माजी मंत्री अनंत गीते, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील,माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत, रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर,रायगड जिल्हा परिषद मु.का.आधिकारी डॉ किरण पाटील, उद्योगपती पी.पी.खारपाटील,शेकाप रायगड जिल्हा सरचिटणीस आस्वाद पाटील सह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.