वाशीतील विकासकांना आणि वाहतूक विभागाला विद्यार्थ्याचे बळी हवे आहेत का?
नवी मुंबई -: वाशी विभागात दिवसा अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी आहे. मात्र या भागात मोठ्या प्रमाणात दिवसा ढवळ्या राडा रोडाची वाहतूक अवजड वाहनांतून केली जात आहे. मात्र या भागात शाळा असल्याने अशा वाहतुकीमुळे या विद्यार्थ्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मागणी करून देखील अशी वाहतूक थांबवली जात नसल्याने येथील विकासक आणि वाहतूक विभागाला विद्यार्थ्याचे बळी हवे आहेत का? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते विकास सोरटे यांनी केला आहे.
सेक्टर ९ आणि १० मध्ये मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाच्या कामांनी जोर पकडला आहे. त्यासाठी धोकादायक इमारती तोडण्याचे काम सुरू आहे आणि सदर तोडकामाचा राडारोडाची वाहतूक अवजड वाहनांतून केली जात आहे. मात्र वाशी विभागात दिवसा अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे.तरी देखील राजरोस वाहतूक केली जात आहे. तर या भागात शाळा आहेत आणि या शाळांत रोज हजारो विद्यार्थी येत असतात. त्यामुळे किमान शाळा सुटण्या आणि भरते वेळी अशी अवजड वाहतूक बंद ठेवावी अशी मागणी सामजिक कार्यकर्ते विकास सोरटे यांनी मनपाकडे केली होती. मात्र या सदर राडा रोडाची वाहतूक आणि पाडकामामागे मोठे राजकीय हात असल्याने मागणीकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने वाहतुकीचे सत्र सुरूच आहे. मात्र अशा वाहुतुकीमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी तर होतच आहे शिवाय अशा वाहनातून जर राडा रोडा कुणाच्या डोक्यावर पडून तसेच वाहनाच्या चाकाखाली येऊन कुणाच्या जिवावर बेतू शकते त्यामुळे मागणी करून देखील अशी वाहतूक थांबवली जात नसल्याने येथील विकासक आणि वाहतूक विभागाला आता विद्यार्थांचे बळी हवे आहेत का? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते विकास सोरटे यांनी केला आहे.
वाशी सेक्टर १० मध्ये महापालिकेचे शहरातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. त्यामुळे या दवाखान्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण तसेच रुग्णांना घेऊन रुग्णवाहिका येत असतात. मात्र राडा रोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. याचा नाहक त्रास रुग्णांना होत आहे. तर अशा वाहतूक कोंडीमुळे दवाखान्यात जाण्यास उशीर होऊन अत्यावश्यक उपचारास जर उशीर झाला तर रुग्णांचा जिवावर बेतू शकते. मात्र याची प्रशासनास कुठलीही पर्वा नसल्याचे दिसून येत आहे.