खारघर - नवी मुंबई आणि पनवेल महानगर पालिका हद्दीत वेगवेगळ्या भागातून नोकरी, व्यवसाय व शिक्षणाकरिता स्थायिक झालेला बंजारा समाज एकत्र येवून आपले सांस्कृतिक वेगळेपण आजही जपत आहे. श्रावणात बंजारा समाजाच्या 'तीज' या सांस्कृतिक महोत्सवाचा,शुक्रवार आणि शनिवारी विविध ठिकाणी उत्साहात समारोप झाला. श्रावण महिना म्हणजे बंजारा समाजातील तरुणींसाठी आनंदाचे पर्व. सर्व हेवेदावे विसरून या तरुणी 'तिजोत्सव'ची स्थापना करून आनंद लुटतात. बंजारा समाजाने अनादिकालापासून तिजोत्सव ही पारंपरिक प्रथा जोपासली आहे. तरुणी रानावनात जाऊन तेथील वारुळाची माती आणून टोपलीत टाकतात. त्यानंतर त्यामध्ये गहू टाकत जवाराची स्थापना करतात. सकाळी आणि संध्याकाळी पारंपरिक बंजारा लोकगीत गात या तरुणी घरोघरी जाऊन त्या टोपल्यात पाणी टाकतात. न चुकता सलग नऊ दिवस ही प्रक्रिया चालते. या दिवसात गहू अंकुरित होऊन स्त्रिया व मुलींनी हिरीरीने सहभाग घेत संत सेवालाल महाराज पोहरगड,देवी सामकी माता देव देवतांची नावाने फेर धरत नृत्य करतात. प्रेत्यक तिज उत्सवात ‘मनं लोवडी दरादरे वीर, आज म चाली रे...’ या गाण्याच्या ओळी मनाला चटका लावून गेल्या. आता आपण पुन्हा वर्षभर भेटणार नाही, ही विरहाची जाणीव तर पुन्हा भेटीची उत्कटता त्यातून व्यक्त होते.