कांदा बटाटा बाजारात धोकादायक छताचे सावट कायम
नवी मुंबई : वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा मार्केट मधील सर्व २३४ गाळे नवी मुंबई महानगर पालिका व एपीएमसी प्रशासनाने धोकादायक घोषित केल्या असून ते गाळे खाली करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र येथील व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी अजून पर्यंत पर्यायी जागा उपलब्ध करून न दिल्याने धोकादायक छताखालीच या व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय सुरु ठेवला आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा बाजार आवाराच्या इमारती मधील २३४ गाळे मागील काही वर्षांपासून पालिका आणि एपीएमसी प्रशासनाकडून धोकादायक जाहीर केले जात आहेत आणि या इमारतींना खाली करण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना करण्यात येत आहेत. मात्र येथील व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने प्रशस्त अशी तात्पुरती व्यवस्था करावी अशी मागणी येथील व्यापाऱ्यांची आहे. २०१९ साली एपीएमसी प्रशासनाने अशी व्यवस्था केली होती. मात्र ती तुटपुंजी असल्याने गाळे रिकामे करण्याविरोधात व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली असून या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केलेली आहे. मात्र सदर प्रकरण अजुनही न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे सदर व्यापारी अजुनही धोकादायक इमारतीत आपला जीव मुठीत धरून व्यवसाय करत आहेत.