रडायला खांदा नसेल तर ?
काही अधिकारी आपण सेवा निवृत झालो आहेत हेच विसरत नाही. ते मी हे होतो, मी ते होतो, माझ्या हा रुबाब व दबदबा होता हेच सांगतात. त्यांच्या या स्वभावामुळे घरातील नात्यातील मंडळी त्यांना नेहमीच टाळतात. मग हा प्रश्न निर्माण होतो. रडायला खांदा नसेल तर? प्रॅापर्टीला काय काडी लावायची? काय चाटायची धनदौलत, बंगला, पलॅट आणि गाडी?
ट्रेड युनियनमध्ये काम करीत असताना अनेक सरकारी निमसरकारी, बँकेत, कंपनीत काम करणाऱ्या कामगारांशी, कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची संघटना, युनियनशी माझ्या कामगार नेता म्हणून संपर्क येत होता. त्यामुळेच त्यांच्या कौटुंबिक समस्यांवर अनेक वेळ चर्चा होत होत्या. मुला-मुलीचे शिक्षण, नंतर नोकरी, त्यानंतर लग्न ह्या प्रत्येकाच्या घरात असतात. नोकरीत असताना कोणीही मदत देण्यासाठी तत्पर असतो. पण एकदा का सेवानिवृत झाला की अनेक मर्यादा येतात. तेव्हा सुरवातीपासून आतापर्यन्त सामाजिक जबाबदारी म्हणून ट्रेड युनियनमध्ये काम करत असल्यामुळे आजही सेवानिवृत कामगार, कर्मचारी अधिकारी यांच्या कौटुंबिक समस्या ऐकायला मिळतात. ज्यांना संघटनेचे महत्व कळले ते सेवा निवृती नंतर सोसायटीतील लोकांना समाजातील किंवा विभागातील एकत्र करून सामाजिक संस्था स्थापन करून काम करतात. विरंगुळा म्हणून सर्व सेवानिवृत ज्येेष्ठ नागरिक म्हणून सकाळ संध्याकाळ एकत्र येऊन सुखादुखाची देवाणघेवाण करतात. त्यात कोणाचा वाढ दिवस कधी होता आणि कसा साजरा झाला याचा विषय निघतो. तेव्हा जुन्या आठवणी डोळ्यातून आपोआप आजची परिस्थिति सांगून जातात. ज्यांच्यासाठी जिवाचं रान केले, कष्ट, त्याग, जिद्धीने कर्ज काढून मुलांचे शिक्षण केले, टू बी एच के पलॅट घेतला, त्याच घरात आपली किंमत शून्य झालेली सहन होत नाही आणि ही समस्या कुठेही मन मोकळेपणे सांगता येत नाही. तेव्हा ही सेवा निवृत जेष्ठ नागरिकांची संस्था खूप महत्वाची ठरते. विरंगुळा, कट्टा अशी अनेक नांवे गेल्या तीन महिन्यात मला दिसली. त्या ज्येेष्ठ नागरिका बरोबर पुन्हा संघटना युनियन काय करू शकते यावर बैठक घेऊन चर्चा सुरू केली. त्यात काही अधिकारी सेवा निवृत झालो आहेत हेच विसरत नाही. ते मी हे होतो, मी ते होतो, माझ्या हा रुबाब व दबदबा होता हेच सांगतात. त्यांच्या या स्वभावामुळे घरातील नात्यातील मंडळी त्यांना नेहमीच टाळतात. मग हा प्रश्न निर्माण होतो. रडायला खांदा नसेल तर? प्रॅापर्टीला काय काडी लावायची? काय चाटायची धनदौलत, बंगला, पलॅट आणि गाडी?
नोकरीत असतांना घरातील नात्यातील समाजातील लोकांमध्ये मिळून मिसळून राहिले पाहिजे. मी अधिकारी होतो. समाज काय म्हणेल ही मनातील भीती काढून टाकली पाहिजे. काय व्हायचं ते होइल. झुगारून टाका मनातील भीती. आता आयुष्याचे दिवस किती उरलेत सांगू शकला काय? अधिकारी-कर्मचारी म्हणून नोकरी करत असणाऱ्यांना मी नेहमी भाषणात सांगत होतो. माणसं जोडायला शिका. तुम्हाला काय वाटते. पैसा करील सगळं ठीक! भावना लिहून व्यक्त करता येत नाही. हरकत नाही, फॅारवर्ड तर करा प्रेम. तुमचा एक मॅसेज सकाळी सकाळी. जगण्यातील दुःखाचा करील गेम. यशस्वी व्हाल न व्हाल. खात्री असो वा नसो. पण संघर्षाची प्रेरणा मनात असणे आवश्यक असावी. आदरही करता आला पाहिजे. विरोधही करता आला पाहिजे. आदर नम्रता दर्शावितो. तर नम्रता तुमची जागरुकता. जे काही मनात साठलंय. ते बोलून टाकायला शिका.
साठलेल्या भावनांचं कर्ज फेडण्यात आयुष्य जाईल फुका. लग्न वर्धापन दिनाचा अमृत महोत्सवी सोहळा. मणीकांचन योगच तो गृह प्रवेशाचा, आप्तेष्टांचा मळा यशाच्या उंचीवरतिच व्यक्ती पोहचते जी सुडाचे नव्हे तर, परिवर्तनाचे विचार अवलंबिते. हे मी जे लिहले ते माझे मित्र अनंत तपासे भारत पेट्रोलियम कंपनीमधून सेवा निवृत झालेले आहेत. त्यांचे दररोज सकाळचे सुविचार मेसेस आहेत. त्यांची एकूण मी मांडणी केली तर कळतच नाही कसा लेख तयार झाला ते.
अधिकारी कर्मचारी म्हणून नोकरी करत असणाऱ्यांनी जगतांना अशा आठवणी ठेवून जा की नंतर आपला विषय निघाला तर त्याच्या ओठावर मंद हसू व डोळ्यात थो पाणी आलंच पाहीजे. फालतूच्या वादविवादाला अर्थहीन म्हणतात; पण अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते, हो ना! सुखदुःखाचे वाटप घेत जगलो तर नात्यातील ओलावा कायम राहतो. आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच झाडे असतात. काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी. काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी. काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी. चांगल्या माणसामध्ये एक वाईट सवय असते. तो सर्वांनाच चांगले समजतो आणि कायम अडचणीत येतो. माणसे प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो. हल्ली गडबड अशी झाली आहे की पैशांवर प्रेम केले जाते आणि माणसे वापरली जातात. चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं, मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. मैत्री, नाती आणि प्रेम ह्या गोष्टी, कधीच मोठ्या किंवा छोट्या नसतात; तर ह्या तिन्ही गोष्टी सांभाळणारी ‘माणसं' मोठी असतात. मग असे प्रश्न निर्माण होत नाही. रडायला खूप खांदे असतात. प्रॅापर्टीची, धनदौलत, बंगला, पलॅट आणि गाडी ह्या त्या माणसाचे वैभव लोकांसाठी लक्षवेधी प्रेरणादायी बनतात.
नकारात्मक (निगेटिव्ह) विचार माणसाला कमजोर बनवतात. तर सकारात्मक (पॉझिटिव्ह) विचार माणसाला बलवान बनवतात. एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल,पण मनाने कधीच कमजोर होऊ नये. कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची ईच्छाशक्ती प्रबळ असते, ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो. तुमच्या कष्टाच्या कहाण्यासुध्दा तुम्ही यशस्वी झाल्यानंतरच सांगितल्या जातात, तोपर्यंत त्या कष्टालाही अजिबात किंमत नसते. अहंकार कोणालाच चुकलेला नाही, त्याचे पण दोन चेहरे असतात. एक ‘स्वाभिमान' आणि दुसरा ‘गर्व' अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होते. तेव्हा ‘कर्तृत्व' जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त ‘विनाशाला' निमंत्रण देत असतो. तेव्हा मग हा प्रश्न निर्माण होतो. रडायला खांदा नसतो. प्रॅापर्टीला, धनदौलतीला, बंगला, पलॅट आणि गाडीला समाजात लोकात काहीच किंमत राहत नाही.
एक अधिकारी समाजात राहणारा असला की सेवा निवृती नंतर घरात बसून तो काय काय उपदेश करतो. मी विविध विषयावर नियमितपणे लिहतो ते आपण वाचत असताच. मित्राने काय लिहले वाचा. चंदन पेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगल आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्वाचे आहे. शौर्य, ज्ञान, बंधुता आणि समानता जगवणारे माझे महान असे राष्ट्र, महाराष्ट्र. ओळख, विश्वास, प्रेम, श्रध्दा आणि भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत. कोणी कोठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्याचं त्यानं ठरवायचं. कुणाच्या ह्रदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते. परंतु, कुणाच्या ह्रदयात आपली जागा पक्की करुन ती टिकून ठेवणे खूप कठीण असते. ज्या वेळी तुम्हाला बघताच, समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे. मग तुमच्याकडे प्रॅापर्टी, धनदौलत, सोने चांदी, जमीन, बंगला, पलॅट आणि गाडी किती आहेत कोणी विचारत नाही. म्हणूनच कर्मचारी अधिकारी म्हणून नोकरी करत असतांना नातलगा सोबत, मित्रांसोबत, समाजासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवा. सेवा निवृती नंतर ते जोडणे शक्य नाही. त्यासाठीच सकारात्मक विचाराने जिथे राहता तिथे संघटित व्हा. अनेक समस्या चुटकीसारख्या सुटतील. -सागर रामभाऊ तायडे