तळोजा औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषणात बेसुमार वाढ
नवीन पनवेल : तळोजा औद्योगिक विभागातील कारखान्यातून सोडण्यात आलेल्या विघातक विषारी पाण्याने कासाडी नदीला लाल रंग आला आहे. या बेसुमार वाढत्या विघातक प्रदुषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर परिसरातील नागरिकांना अनेक आजारांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे या विषारी प्रदुषणापासून नागरिकांची सुटका होईल की आम्हा स्थानिकांचा जीव घेण्यावर प्रशासन बसले आहे, असा संतप्त सवाल ‘काँग्रेस'चे पनवेल जिल्हा पर्यावरण अध्यक्ष सुरेश पाटील यांनी येथील नागरिकांच्या वतीने ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'ला केला आहे.
तळोजा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ‘तळोजा औद्योगिक विकास मंडळ'कडे गेल्यापासून कासाडी नदीच्या प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'चे अधिकारी बेलापूर आणि तळोजा औद्योगिक विकास मंडळ यांच्यामधून विस्तव जात नसल्याने त्याची किंमत येथील स्थानिक नागरिकांना मोजावी लागत आहे. प्रदुषण करणाऱ्या कारखान्यांकडून दोन्ही आस्थापना हप्ते वसूल करत असल्याने येथील प्रदुषण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचा गंभीर आरोप सुरेश पाटील यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रात्री कारखान्यातून विघातक पाणी सोडण्यात येत आहे. दीपक कंपनी ते वलप गणेशनगर विसर्जन घाट दरम्यान कासाडी नदीचे पाणी लालच लाल झाले आहे. याची माहिती ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या नवी मुंबई कार्यालयाला आणि तळोजा तळोजा औद्योगिक विकास मंडळ यांना देण्यात आली.
यानंतर संबंधितांकडून कासाडी नदीच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. पण, त्यावर अद्याप कोणतीही कारवाई न करता येथे आर्थिक हितसंबंध जपले गेल्याचा संशय आहे. त्यामुळे येथील कंपन्यांना कासाडी नदीत विषारी पाणी सोडण्याची मुभा देण्यात आल्याचे सुरेश पाटील यांचे म्हणणे आहे. आज त्यापेक्षा भयानक परिस्थिती कासाडी नदीची झाली असून नदीचे पाणी लाल झाले आहे. सदर पाणी जमिनीत मुरले जावून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात येवून त्यांना आस्थमा, छातीत जळजळ, फुफुसाचे आजार जडले आहेत.
तर लहान मुलांची वाढ खुंटत असून त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे, असे सुरेश पाटील यांनी ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'ला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व तळोजा औद्योगिक विकास मंडळ यांच्याकडून न्यायालयाचे आवमान करताना तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये सर्रासपणे रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच कासाडी नदीत, मोकळ्या भूखंडावर सोडले जात असताना तळोजा पोलिसांपासून प्रदुषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी तसेच पनवेल महापालिका प्रशासन गप्प बसले आहे. तळोजा सांडपाणी प्रकल्पाला वाहून आणणाऱ्या वाहिन्या दिशाहीन व्यवस्थापनामुळे टाकण्यात आल्याने त्या जागोजागी जाम झाल्याने फुटल्या आहेत. या वाहिन्यांचे चेंबर जाम झाल्याने कारखान्यातील विघातक पाणी थेट कासाडी नदीत जात आहे. नवीन टाकलेल्या वाहिन्या आणि त्याचे जाम झालेले चेंबर साफ करण्यासाठी ‘एमआयडीसी'ने भागीदारीत ठेकेदार नेमल्याने त्यावर महिना लाखो रुपये खर्च केला जात आहे, असा गंभीर आरोप सुरेश पाटील यांनी केला आहे.
तळोजा औद्योगिक नगरीत प्रदुषणाचा महाराक्षस पोसणाऱ्या ‘प्रदुषण'च्या ‘वाझेफेम' अधिकाऱ्यांनाही राज्य शासनाने जबाबदार ठरवून त्यांना सहआरोपी का केले जात नाही, असा सवाल सुरेश पाटील यांनी केला आहे.
राज्य सरकारचे उद्योगमंत्री, नगरविकास मंत्री आठवड्यातून तळोजा औद्योगिक नगरीत ‘या ना त्या' कारणाने पायधुळ झाडत आहेत. त्यांच्या कानावर स्थानिकांनी, वारकरी, नागरिकांनी हजार वेळा प्रदुषणामुळे जनजीवन धोक्यात आल्याच्या तक्रारी केल्या आहेत. परंतु, प्रदुषणाला आळा घालण्याचे पवित्र काम कुणीही करायला मागत नाही. त्यामुळे तळोजासह पनवेल महापालिका क्षेत्राचा एक दिवशी भोपाळ होण्याचा मार्ग सदर सारे मंत्रीगण आणि त्यांचे अधिनस्त अधिकारी करीत असल्याचे दिसते.
दरम्यान, तळोजा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम ‘एमआयडीसी'कडे वर्ग केल्यापासून येथील प्रदुषणात बेसुमार वाढ झाली असल्याचा आरोप ‘काँग्रेस'चे पनवेल जिल्हा पर्यावरण अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केला आहे.